फॉलोअर

शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

शुभेच्छामंडल

 विधायक, शुभेच्छारुपी शब्द ही परमेश्वराची अनेकविध रूपे होत.जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शब्दांठायी असलेली अस्त्र-शस्त्र,धनरूपी संपत्तीची महानता वर्णिली आहे.देवप्रतिमेची अनभिज्ञता मान्य करुन   'ओंकार ' स्वरुपात देव पाहण्याचा सुलभ सोपान ; धार्मिक ग्रंथ,अधिकारी संत-महंत यांनी आम्हांला दर्शविला आहे.प्रारंभी देव शब्द होता. शब्द देवासह होता. असा उल्लेख पवित्र धर्मग्रंथ बायबल मध्येही आलेला आहे. अक्षर ब्रह्माच्या मंगल चिंतन,मनन-निदीध्यासात योगीजन मनाच्या प्रबळतेचा अनुभव मिळवतात. ती तशी शुचिता,शरीरमनाची सौष्ठवता मिळवण्याच्या मार्गावरील सहप्रवासी आपण आहोत.


          आपणा शब्दपूजक, शुभवाणीप्राप्तजनांकडून वाढदिवसाच्या निमित्ताने मला मिळालेल्या शुभेच्छा, आशीर्वाद मी कृतज्ञता पूर्वक स्वीकारून माझ्या अंतर्यामात त्यांना ठेवले आहेत. त्यामुळे मी श्रीमंत आहे. भविष्यात तील वाटचाल करण्यास हे संचित मला लाभदायक ठरणार आहे असा विश्वास वाटतो. विश्व मंडलात सर्वकाही संग्रही राहते. ते अक्षय असते. म्हणूनच वाढदिवशी माझ्यासाठी आपण व्यक्त केलेल्या शुभेच्छा विश्व मंडलात सुरक्षा ठेव म्हणून माझ्यासाठी सुरक्षित असणार आहेत. त्यांचा  सुपरिणाम आपणासही मिळो या कृतज्ञतेसह, शुभेच्छांसह आपणास धन्यवाद देतो.

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

वाढदिवस:महामारीतील काळोखातला

 पिंजऱ्या बाहेर काढलेल्या वाघ-सिंहाचे थरारक प्रयोग एक रिंग मास्टर सर्कशीत दाखवत होते. त्याच वेळी नेमकी वीज गेली. तिच्या उपलब्धतेची वानवा असलेल्या त्या काळात ; सर्कशीच्या महाकाय तंबूत, प्रेक्षकांच्या भरगच्च गर्दीत हाहा:कार उडाला असता. अनेक निरपराध कालःहत झाले असते. मात्र त्याच वेळी कोणा एकाने आगपेटीची काडी पेटवून " प्रकाश-प्रकाश "अशी आरोळी ठोकली. प्रतिसाद स्वरूप तेथील इतर जणांनीही काडी पेटविण्याच्या , त्या कृतीचे अनुकरण केले. पुरेसा प्रकाश त्या तंबूत पसरला. रिंग मास्टरने तेवढी वेळ साधत वाघ-सिंहाना पिंजऱ्यात नेले.तोपर्यंत विजेची पर्यायी व्यवस्था झाली.प्राणहानी टळली.

       संसर्गित विषादाचा काळकाळोख आपल्याभोवती पसरलेला आहे अशा भीतीत वावरताना ; प्रियजनांच्या अंत:करणातून बाहेर पडणाऱ्या शुभेच्छा प्रकाशाचे दान देतात. सावरायला आणि निर्विघ्नतेने चालायला वाट दाखवतात. पहिली काडी चेतविणारा व तद्नंतर त्याचे अनुकरण करणारा प्रकाशयात्री समूह खूप मोठे विधायक कार्य करत असतो. आज माझ्यासाठी आपण ते केलेत.आपणाला धन्यवाद देऊन त्याचा स्वीकार करतो. आपल्या शुभेच्छांना प्रार्थना मानून शांत-खंबीर मनाने चालत राहतो .
             सुरेश भिंगारदिवे,
                          

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

बर्थडे इन क्वारंटाइन डेज

 वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या आपणा सर्व समूह जनांना सविनय धन्यवाद. सूक्ष्मतम विषाणूमुळे सर्वांनाच युद्धजन्य जीवनक्रमाला सामोरे जावे लागत आहे . मनःस्थिती विफल करणाऱ्या अनेक घटनाही दरम्यानच्या कालावधीत आपल्या मित्र, स्नेही यांच्या पारिवारिक जीवनात घडल्या. सर्वच समाज जीवनावर दूरगामी परिणाम करणारी व्याधी, तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींवर ओढवलेल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर उत्सवप्रियता, सत्कारसाजरीकरण यांवर मर्यादा पडणे स्वाभाविक आहे. त्या मर्यादा आपण पाळत आहोतच. त्यातला एक घटक मीदेखील आहे. व्याप, वाताहत यांच्या अनामिक भीतीचे मळभ सांप्रत काली इतरांप्रमाणे माझ्यावर सुद्धा आहे. प्रियजनांच्या शुभेच्छा खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी बळ पुरवणाऱ्या असतात. आपल्या स्नेहभारीत शुभेच्छांचा स्वीकार करताना ही जाणीव मनोमन मलाआहे. त्या सशक्त संवेदना माझ्यासाठी आत्मविश्वासपूरक अशा आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे ते बळ मला निश्चितपणे मिळाले. सद्यस्थितितील दुःस्थितितून संपूर्ण निर्विघ्नतेकडे ,आरोग्यपूर्ण संक्रमण होण्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना. शुभेच्छा. आपल्याविषयीच्या कृतज्ञतेसह !

                                                     आपला

                                       ..       सुरेश भिंगारदिवे

बापाची आठवण

 बापाची आठवण


    आता दिवस मोजत मरुपर्यंत

    बापा तुझी आठवण नाही संपत


    तुझा अन्नरस सत्वशील भारी

    त्याची उभारी;त्याची शिदोरी

    मी घेऊन फुललो,तू झिजला कष्टत

    बापा तुझी आठवण नाही संपत

    

     निःसंगता तुझी यापुढची

    पोकळी पोरक्या रितेपणाची

    आमरण काहिली घरघर, साहून मी जीवंत

    बापा तुझी आठवण नाही संपत


    घर अन् धनाचा , तू दिला दायभाग

    आणि वाढलेली , तुझी संपन्न बाग

    जाळली हकिम खळांनी , ज्यांचे विषारी हस्त

    बापा तुझी आठवण नाही संपत


                        - सुरेश भिंगारदिवे

                            श्रीरामपूर

जलसाक्षरता

 जलसाठ्यांलगतच्या परिसरात वास्तव्य करण्याची प्रवृत्ती आदिमानवापासून सर्वांचीच आहे. भूत,वर्तमान आणि भविष्याची पाळंमूळं पाण्यानचं पोसली जातात. म्हणूनच "जल है तो कल है" असा जलसाक्षरतेचा जागर करणारा 

उद् घोष सद्यस्थितीत वारंवार होताना आपण ऐकतो आहोत. जलव्यवस्थापनाची खूप मोठी सतर्कता त्यातून सूचित होत असते. सिंचनाच्या,जलवहनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे

दूरवरच्या लोकांना आजपर्यंत जलअभावाला क्वचितच सामोरे जावे लागले. मात्र येथून पुढे हीच स्थिती टिकून राहील याची शाश्वती नाही. पाण्याचा दुरूपयोग,अपव्यय करण्याचा करंटेपणा समाजाकडून घडू नये म्हणून जलसाक्षरतेवर आधारित होणारी संमेलने महत्वाचे कार्य करत आहेत. 

        यादृष्टीने अकराव्या जलसंमेलनातून "कुणा एकाची धरणगाथा" विषयाच्या अनुषंगाने आपण मांडलेले विचार खूप महत्त्वाचे आहेत. डोंगर,भिंत यातून साकारणारे धरण ; त्यात साठणारे पाणी व त्यातून बहरणारा,फुलणारा सभोवतालचा 

मानवी परिप्रेक्ष्य हा केवळ भूगोलाशी निगडीत नाही. तर वैभवशाली जिवितक्रमाच्या कृतार्थने भरलेल्या सांस्कृतिक संचिताशी त्याचे महत्वाचे नाते आहे. पाणी,मानव,निसर्ग यांच्यातील नात्याची वीण दृढ होण्यासाठी अशी जलसंमेलने 

महत्वाचे कार्य करणार आहेत.

  नवीन धरणाच्या उभारणीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी गोपाळ मोरे यांनी जी कष्टप्रद वाटचाल केली;तिचे आपण केलेले यथार्थ वर्णन संवेदनांच्या पातळीवर सद् गतीत करून गेले.

ललित कलांचे प्रकटीकरण करणा-या संमेलनांचेच लोकमानसाला आकर्षण असते. या पार्श्वभूमीवर भूगोलाधारित विषय असलेल्या जलसंमेलनातून आपण जे विचार मांडले त्यातून साहित्यिक अभिरुचिचे प्रातिभ संस्कार श्रोत्यांना अनुभवायास तर मिळालेच पण त्याचबरोबर गोपाळ मोरेंसारख्या समाजहितैषी ध्येयवेड्या व्यक्तीचा प्रेरणादायी जीवनपट समजून घेता आला.अलिकडच्या काळात धरणातील जलअभावाच्या चिंताउद्वेगाचे समर्थन विकृत पद्धतीने मांडणा-या लोकप्रतिनिधींनी गोपाळ मोरेंचा जीवनपट व त्यांची धरणगाथा आदिंचा अभ्यास करावा. म्हणजे त्यांच्या ठायी विचारांची पक्वता आणि प्रगल्भता निर्माण होईल. 

   धरण बांधण्याची गोपाळ मोरे यांची मागणी तत्कालीन राज्य-शासन यंत्रणा,लोकप्रतिनिधी यांनी कशी दुर्लक्षित केली; सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अथवा सत्तेपुढे पुष्कळदा शहाणा हा वेडाच ठरतो. याबाबतचा उहापोह करतानाच तत्कालीन महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अभ्यासू,दूरदृष्टीयुक्त वृत्तीचे यथार्थ गुणगौरव देखील वस्तुनिष्ठपणे आपण प्रकट केले. श्रोत्यांना ते भावले.आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणा-या ॠषितुल्य विठ्ठलराव विखे यांच्यासारख्या लोकनायक,समाजधुरिणांसारख्यांच्या आदर्शवाटेवरील असे गोपाळ मोरे या निमित्ताने माहीत झाले. प्रेरणादायी ठरले. 

        खूप खूप धन्यवाद. आपला स्नेहांकित. 

              सुरेश भिंगारदिवे, राहाता. 


फादर फ्रॅन्सिस खेडेकर:माझे शिक्षक

 फा.फ्रान्सिस खेडेकर:माझे शिक्षक 


 मानवीय सेवेद्वारा ईश्वरीय कार्यास हातभार लावण्याचे कार्य धर्मगुरू करत असतात.बोलावलेल्या पुष्कळांपैकी निवडक व्रतस्थांचे चर्चच्या कर्मपीठावर आमंत्रित होणे ही बाब केवळ दैवीच नाही; तर लौकिक जीवनातील  तपस्वी जीवनक्रमाच्या पात्रतेची सिद्धता असण्याचे द्योतकही आहे. घर,कुटूंब,गाव,आप्तस्वकीय,प्रांत किंवा देश अशा आकर्षणीय मर्यादांचे स्थानांतर करून उदार वैश्विक  स्नेहानुभाव त्यांनी स्वीकारलेला असतो.हा समतामूलक सेवाभाव जगभरातील मिशनरींनी एका विशिष्ट काळात भारतीय भूमीत प्रसृत केला.ब्रिटिश येथून गेल्यानंतरही पुष्कळ  मिशनरी समर्पण भावनेने येथे राहून येथील वंचितांचे अध्यात्मिक उन्नयन करत राहीले. 'वसुधैव कुटूंबकम' हा येथील संस्कृतीचा मूल्यघोष ख-या अर्थाने त्यांच्या आचार विचार, आणि वाणीतून ध्वनित होत होता.स्वतःचे घर, कुटूंबिय,यांचा त्याग करुन देशाच्या सीमेपार सेवारत राहणे ;  ईश्वरीय कार्याचा तो भाग समजणे, देवाने केलेले पाचारण मानणे असा सर्वोच्च परमेश्वरशरणतेचा भाव त्यांच्यात होता.

    अशा दिव्य कार्यसंचिताचे अधिष्ठान भारतीय चर्चला लाभलेले आहे.हे मान्य करणे हा आपल्या प्रांजल कृतज्ञतेचा भाग आहे.सद्यस्थितीत देखील महामहीम धर्मगुरुंचे कार्य चर्चद्वारे धर्मग्रामातून चालू आहे. माझा आयुष्यातील जडण-घडणीचा महत्वापूर्ण  शैक्षणिक काळ हरेगाव येथील चर्च परिसरात व्यतीत झाला. ख्रिस्तप्रेरित शिकवणुकीचे, कर्तव्यनिष्ठ कार्यक्रमणाचे सुसंस्कार तत्कालीन फादर्स,ब्रदर्स यांच्याकडून आमच्यावर घडले.

      सन्माननिय फादर फ्रान्सिस खेडेकर यांच्या धर्मगुरूपदावरील सेवारंभाच्या पंचवीसाव्या वर्धापनादिनाच्या निमित्ताने त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला. स.1988 साली इयत्ता आठवी मध्ये इतिहास विषयाचे धडे त्यांच्याकडून शिकावयास मिळाले.संन्यस्त धर्मप्रसारकाचे व्रत स्वीकारलेल्या  ब्रदर फ्रान्सिस यांच्या तेजःपूंज व्यक्तिमत्वाने; अध्यापनाच्या सुलभ शैलीने आम्ही विद्यार्थी विलक्षण प्रभावित व्हायचो.त्याहीपेक्षा आवाजात असलेली धारयूक्त जरब ; समुहाला दीपमान करणारा झोतसदृश्य कटाक्ष अशा व्यक्तित्वातील त्यांच्या सामर्थ्यस्थळांमुळे आम्ही विद्यार्थी वर्गात कदापिही विचलित होत नसू.त्यांचे इतिहास विषयाचे अध्यापन होत असताना मानसिक पातळीवर अनायसेच जगभरातील वेगवेगळ्या देशात आम्ही फेरफटका मारुन यायचो.ईश्वरीय सेवेचे क्षेत्र स्वीकारलेले ब्रदर इतिहास शिकवतानाही आम्हाला पौराणिक ऋषिमुनींसारखे तपस्वी वाटायचे.कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वातील याच पैलूंमुळे वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षण,निवास,संस्कार याबाबतचे संनियत्रण चर्च व शाळाव्यवस्थापनाने त्यांच्यावर सोपवले होते.

    ख्रिस्तजयंतीच्या सोहळ्याचे साजरीकरण ही एक वेगळी पर्वणी आम्हा विद्यार्थ्यासाठी असे.सांताक्लाॅज,नाताळाच्या सुट्ट्या,मनोरंजनाचे विविध कार्यक्रम अशी माफक कारणेही त्या बालसुलभ वयात आनंदासाठी पुरेशी व्हायची.मात्र याच निमित्ताने त्या काळात फादर फ्रान्सिस यांनी खूप चांगले कलात्मक संस्कार आमच्यावर केले.नाताळाच्या कार्यक्रमात,प्रार्थना-भक्तीत गावयाच्या विविध गीतांचे गायन त्यांनी आम्हाला शिकवले.'  

                                       चूप है चंदा,चूप है तारे

                                       जन्मा है जन्मा है जन्मा मसिहा

                                       रात की खामोशीमें...रात की       

                                        रात की खामोशीमें.'

गेली तीस एकतीस वर्षे तेव्हापासून आजतागायत ख्रिस्तजयंती म्हटले की फादरांनी शिकविलेले -  ' चूप है चंदा,चूप है तारे ' हेच गीत आठवते.

       इतर कोणीही हे गीत गावो; मला फादर फ्रान्सिस हेच आठवतात.त्यांचा त्यावेळी लागलेला रियाजाचा स्वर कर्णपटलावर, मनःभूमीवर स्मृतिसंवेदनेच्या माध्यमातून गुंजारव करतो. असे म्हणतात की गायन करणारा एकप्रकारे ईश्वराचीच आराधना करत असतो.प्रभूची स्तुतिसुमने गाण्यासाठी, तसेच स्तोत्रसंहिता आळवण्याच्या ईश्वरीय कार्यात बळ मिळो या शुभेच्छा त्यांच्या ईश्वरीय सेवेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने व्यक्त करतो. 

       सुरेश दगडू भिंगारदिवे,राहाता 9860202386



   

हिरोशिमा दिन आणि वाढदिवस

 सहा ऑगस्ट या हिरोशिमादिनी आपला जन्म झालेला.2019सालातील याच दिवशी चाळीशी संपवून उतरणीच्या नव्या स्थित्यंतराला सामोरे जाताना "अत्तराची बाटली संपू लागते तेव्हा ती जास्त जपायची असते" या वपुंच्या अवतरणाची आठवण झाली. चाळीशीच्या उंबरठ्यावरही माझ्यातले बालपण पाहून "आता तुम्हाला शहाणपण येईल "अशी खोचक प्रतिक्रिया वाढदिवशी देणारा सहकारी भिववून गेला.अजूनही बाकी राहिलेली कामे, जबाबदाऱ्या आणि त्यांची स्मरणांदोलणे अंतचःक्षूंसमोर सुरू झाली. मात्र आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे येथून पुढे करावयाच्या कर्मयोगासाठी ऊर्जा मिळाली. प्रौढत्वी निज शैशवास जपणे सुखकर झाले. बोलून वा संदेश पाठवून वाढदिवसाच्या  साजरीतकरणात सहभागी होणार्‍या मित्र परिवाराचे ऋण अनुपम आणि अफेड असे आहे. पुनश्चः धन्यवाद!




 माझ्या वाढदिवशी आपणा सर्व; मित्र-स्नेहीजनांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात. कौतुक प्रशंसेची, विविध उपमा-उपमानांची स्तुतीसुमने उदात्त वृत्तीने माझ्या ओंजळीत टाकलीत. अंतःकरणपूर्वक आपण प्रदान केलेली सदभावनांची ही सत्वशक्ती ;माझ्या आयुष्यात घडणार्‍या घटना प्रसंगात मनाचे समत्व राखण्यास मला  बळ देईल. आपल्या या अफेड देयदाना बद्दल मी आपला कृतज्ञ आहे.


+91 93730 


 नमस्कार सर.

 महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून गौरविलेल्या आणि महाराष्ट्रासाठीही भूषणावह असलेल्या 'पु.ल' यांचा  आपणासाठीचा स्वहस्ताक्षरलेख  वाचण्यास मिळणे हा माझ्यासाठी मोठा भाग्ययोग आहे. 

       राजकीय नेते,पुढारी यांची शिफारस पत्रे नियुक्ती,बढती,बदली यांसाठी वापरणा-यांचा खूप मोठा वर्ग समाजात आहे.त्यातलाच एक घटक मी देखील आहे;हे मला प्रामाणिकपणे कबूल करावेच लागेल.मात्र या राजधुरंधरांनी दिलेली शिफारसपत्रे मुद्रितस्वरुपातील आणि 'पी.ए.' प्रेरित असतात.कित्येकदा तर त्याखालील स्वाक्षरीही वेगळीच असते. अर्थात काही सिध्दहस्त,प्रगल्भ,अभिरुचीसंपन्न राजनीतिज्ञांचा अपवाद याबाबत वगळावाच लागेल.

     औरंगाबादेत असताना विद्यार्थीदशेत एकदा प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक रा.रं.बोराडे यांनी दंडस्वरुपात मला जोराने हाताचा धक्का दिला होता.त्या संवेदनांना इनाम मानून मनोमन त्या मी आठवत अनुभवत असतो.प्रसिद्ध कवि,महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.फ.मु.शिंदे यांच्या विषयी मला खूप औत्सुक्य,अप्रुप वाटायचे. प्रत्यक्ष त्यांच्याशी ओळख तर नव्हती पण मनातलं कुतूहल स्वस्थ बसू देत नसे.म्हणून मी त्यांच्या 'यमुना' नामक बंगल्याच्या समोरुन मुद्दाम भटकायचो.त्यांना पाहण्यासाठी अधीर व्हायचो.'  'व-हाड' कार स्व.डाॅक्टर लक्ष्मण देशपांडे यांच्या घरी काम   करणा-या मुलाची डाॅक्टरांच्या घरुन दिलेली पोळीभाजी प्रसाद म्हणून खायचो.

या पार्श्वभूमीवर अनुभवाचा एक विधायक प्रदेश आपल्या पत्राने मला दाखवला. आपणास साक्षात पुलंनी प्रमाणपत्र द्यावं ही मोठी मिळकत वाटते. तो आपला सन्मान आहे.पूर्वी असेच दिलीप फलटणकर यांना ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त थोर लेखक वि.स.खांडेकर यांनी लिहिलेले  पत्र वाचण्यास मिळाले. दिलीप फलटणकर यांच्याशी माझा तसा प्रत्यक्ष परिचय नाही.पण कधीतरी  भेटलेले ते पत्र मी पुष्कळ वेळा आवडीने वाचले आहे.खांडेकरांच्या लेखनाची शैलीही त्यामुळे मला आवडू लागली.त्यांच्या काही साहित्यकृतींच्या वाचनाचा आनंदही त्यामुळे मिळवता आला.  खूप आनंद दिला त्या पत्राने.'पत्र ही अर्धी भेटच असते' हे तत्कालीन पत्रप्रभावित जमान्यात म्हणूनच म्हणायचे. खरोखरच पत्राद्वारा ह्रदयाच्या खूप खोल कप्प्यात जाता येते.असो.

     पुलंनी आपल्यासाठी लिहिलेल्या पत्राची आपण मला सहभागिता दिली.हे मी माझे भाग्य समजतो.त्यांच्या 'अक्षर' साहित्याचा वाचनानुभव घेणे सांप्रत काळी सहजशक्य झाले आहे.मात्र मानवी मनांवर व्यवहाराच्या धबडग्यात  धकाधकीची पुटं चढून साहित्यादी कलाभिरुचिपासून ती दूर जात आहेत. भाईंच्या साहित्याचा आस्वाद घेऊन खरच तो आनंद आपण मिळवावा असे वाटू लागले आहे.आपला प्रत्यक्ष संपर्क त्यांच्याशी आला.माझा भक्तिभाव आपल्याशी आहे.त्या सात्विक लहरी आपणामार्फत मला मिळाल्या असे मी मानतो. त्या प्रित्यर्थ धन्यवादही देतो.

      सुरेश भिंगारदिवे,राहाता


पत्रलेखन

 नमस्कार सर. 

'एका अत्र्यात दहा अत्रे आहेत' असे विनोदाने स्वतः आचार्य अत्रे हेच म्हणत. आचार्य अत्रे यांच्या अशा विविध क्षेत्रातील कार्यकिमयेचा प्रेरणादायी परिचय ; पुढील अनेक पिढ्यांना देण्याचा समाजोपयोगी उपक्रम 'आचार्य अत्रे प्रतिष्ठान ' करत आहे.त्यानिमित्ताने आपण सांगितलेल्या आचार्यांच्या आठवणी पुलकित करणा-या आहेत.'मनोरंजन' , 'सुयोग' , संस्थांनी नाटकांना दिलेला आधार; आचार्य अत्रे यांचा या संस्थांशी असलेला स्नेहानुबंध वगैरे अभिजात साहित्यिक वार्तालाप आपण केलात.         झ-याच्या मनोहर प्रवाहासम,ओघवत्या शैलीचा व प्रासादिक मंगलध्वनिचा दृकश्राव्य अनुभव यानिमित्ताने  मिळाला.अत्रे  नामक दैदिप्यमान,अष्टपैलू शक्तीची उपासना करणारा वाचकवर्ग त्याद्वारे निर्माण होऊन 'आचार्य अत्रे प्रतिष्ठान'चा संकल्प सफल होवो. ही प्रार्थना.


छायाचित्र

 साहेब ,अशा अभिजात  जुन्या आठवणींमुळे मन अधिक हळवे आणि संवेदनशील बनते. असे असले तरी एका अद्भूत, अनामिक स्फूर्तीचे सृजन अंतर्यामी अनुभवायलाही मिळते. विषादाच्या संसर्ग क्षणी प्रतिकाराची भरभरून उर्जा देण्यासाठी  असा एखादा आठवणीतील फोटो पुरेसा ठरतो.

आभार

 माझ्या वाढदिवशी आपणा सर्व; मित्र-स्नेहीजनांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात. कौतुक प्रशंसेची, विविध उपमा-उपमानांची स्तुतीसुमने उदात्त वृत्तीने माझ्या ओंजळीत टाकलीत. अंतःकरणपूर्वक आपण प्रदान केलेली सदभावनांची ही सत्वशक्ती ;माझ्या आयुष्यात घडणार्‍या घटना प्रसंगात मनाचे समत्व राखण्यास मला  बळ देईल. आपल्या या अफेड देयदाना बद्दल मी आपला कृतज्ञ आहे.

शिक्षक दिनी विद्यार्थ्यांची गुरुप्रति कृतज्ञता

 *  पत्र *

           *शिक्षकदिनी गुरुप्रति ; विद्यार्थ्याची कृतज्ञता*


         संत तेरेजा विद्यालयातील सर्व गुरूवर्यांसी, सविनय प्रणाम. आपणाला असं पत्र लिहिणं; त्याद्वारा आपणाकडून मिळविलेल्या अफेड ज्ञानदाना प्रति नतमस्तक होणं माझं मलाच सुखावून जात आहे. आपल्या सहवासात येताना प्रारंभीच निराकारी असणाऱ्या बालमनाला आपण आकारी बनवलत. कारणी लागण्यायोग्य पात्रतेची सामर्थ्यशील शिदोरी आपण मला दिलीत. त्यायोगे मिळालेली निःसंदेही वाटचालीची प्रेरणा क्षण नि क्षण मला आयुष्याचं शिक्षण देत आहे .कालौघात लुप्त झालेल्या आपल्या सहवासाची उणीवही ती नेहमीच भरून काढत आहे.

      विद्यार्थी बनून आपल्या विद्यादातृत्वी छत्राखाली राहण्याच्या सुखद अनुभवाची आज समाप्ती झाली आहे.तरीही आयुष्याच्या बेतौल पथक्रमणात सावरण्याचे शिक्षण देणारे, सभोवतालातून तसं शिकण्याची जाणीव निर्माण करणारे आपले आशीर्वाद परम हितैषी बनून माझ्या अंतर्यामी स्थित आहे.

      शिक्षणक्रमातल्या दहाव्या इयत्तेच्या अखेरीस आपणाकडून मी निरोप घेतला. विद्यालयीन सहवासाच्या त्या अखेरच्या पर्वात आपल्याच बळाधाराने मिळविलेल्या यशाप्रित्यर्थ आपण मला कौतुकमाला घातल्या. माझ्या वडिलांचा सत्कार केलात. त्या क्षणापर्यंतही मी अहंमविकारीच होतो. कृतज्ञता भाविकतेच्या पातळीवरील, माझी तत्कालीन निर्भाव मनस्कता ; आज मला सारखी वेदना देत आहे.

आपल्या आशिषवर्षावात फुलारणाऱ्या माझ्या आयुष्याला खरतर मीच कृतज्ञतायुक्त जाणीवेचे अधिष्ठान द्यावयास पाहिजे होते. पण मी मात्र खुशाल घेण्याचाच क्रम चालू ठेवत होतो. सर्जनशील संवेदनांना केवळ स्वार्थलोलूपतेतच अडकवू पाहत होतो. माझे मागणीपात्र कसे भरत आहे? कोण भरत आहे? यांसारख्या कार्यकारणभावाचा शोध करणे मला जमलेच नाही. सर , बाई आपणही किती थोर ! मी मिळविलेल्या आपल्या देयदानाचे मोल मला त्यावेळी भासू देखील दिले नाही. तसे मोल आपण केलेही नाही. उलट सारखे भरभरून देत राहिले. माझ्या अज्ञानजन्य निर्भाव मनस्कतेला आपण आपल्या समंजस जाणिवेनं बालबोध समजलात. माता-पिता बनून मला आश्रय दिला. मला सांभाळले. म्हणूनच मी वाढलो. आयुष्यात उभा राहिलो. जीवनातल्या अडीअडचणींना समर्थपणे सामोरे जाण्यास शिकलो. अक्षरांना वळण देणारी मी भविष्याला सुखकारक बनविणारी लेखणीची पकड आपल्या हातांनीच माझ्या हातांना शिकविली. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आब्राहम लिंकन यांनी विद्यार्थीहितार्थ आपणाला पत्र लिहिले. विद्यार्थी पितृत्वाची बांधिलकी बाळगणारे या नात्याने या थोर विभूतीचा 'धर्माचा पुत्र' असे स्वतःस म्हणवून घेण्यास मला सार्थ संतोष वाटतो. त्यांनी केलेल्या पत्ररुपी सूचना संदेशाचे पालन कृत्रिमतेने करण्याची कसरत आपल्याला कधी पडलीच नाही. मूलत:च तो अमूर्त वारसा आपण मिळविलेला आणि विद्यार्थ्यांत रुजविलेला होता. असे बोलून मी मोठे धाडस करू पाहतोय असे आपणांस वाटेल. त्याच ओघात माझे बोलणे स्वयंप्रशंसकाच्या पारड्यात तोलले जाण्याचीही मला भीती वाटते. मी इतका मोठा नाही सुद्धा. ते सर्वच मी प्राप्त केले असेही मला म्हणायचे नाही. परंतु तरीही आपण ते सर्व मला आणि माझ्या सभोवतालच्या विद्यार्थ्यांना देण्याचा, गळी उतरविण्याचा प्रयत्न केला. मी कितपत मिळविले ,कारणी लावले यावर अथवा माझ्या पात्रता कौशल्यावर ते अवलंबून आहे. शेवटी मूर्ती घडविण्यासाठीही चांगल्या प्रतीच्या दगडाची आवश्यकता असतेच.छन्नी हातोड्याच्या एका भेदनातच जर त्याच्या ठिकर्‍या उडत असतील तर ते व्यर्थच ; असे त्यावेळी समजले जायचे. तात्पर्य असे की आमच्या साठीचे आपले प्रयत्न सर्वस्वीपणाचे होते. हे मनोगतं विनयपूर्वक सांगण्यासाठी मला या पातळीपर्यंत धाडस करण्याचा खटाटोप करावा लागला. मी याबद्दल आपली क्षमा मागतो.

                  बाई,तुम्ही आईचेच एक रूप होता. शाळा आणि घर या दोनच क्षेत्रांनी माझं सर्वाधिक बालविश्व त्यावेळी व्यापलेलं होतं. घरात आईच्या आणि शाळेत तुमच्या या दोनच रूपात मातृत्वीसंजीवनाची तहान भागविणारे झरे मला माझ्या बाल्यावस्थेत लाभले होते. केवळ त्याच वरदानावर आज मी माझ्या आत्मसुखासाठी विधायक ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातून मिळणाऱ्या प्राप्तीत मला समाधानही मिळत आहे. अनेक दुविधात्मक प्रश्नांमधून इष्ट ती मार्गनिवड करण्यास आपण दिलेल्या शिक्षणाचे,आशीर्वादाचे बळ माझ्यासाठी पुरेसे ठरत आहे.झोकापंचमीच्या आधील दिवशी "झोका जपून खेळा. पडू नका .भान ठेवा." यासारख्या तुम्ही दिलेल्या अवधानसूचक सूचना अजूनही कर्णपटलावर हलकेच ऐकू येतात.त्यांचे पडसाद अगदी अंतःकरणीय संवेदनांशी जुळून जातात. आमच्यासाठीची तुम्ही बाळगलेली माया,ममता,करुणा, काळजी यांची जाणीव करून देतात. बाई, मन खरंच फार भरून आलं आहे. तेव्हा का बरं इतकी जाणीव झाली नसावी? बालपणाची मर्यादा इतकी व्यवहारी असते का? इयत्तांच्या पायऱ्या चढत-चढत मध्यंतरीचा किती काळ तुम्हाला विसरलो होतो. 

           बाई तुम्ही शिकविलेले पुस्तकांमधील सर्व धडे अजूनही बुद्धीत बिंबलेले आहेत. मात्र शिकवून संपलेल्या प्रत्येक धड्याची उलटली जाणारी पाने ; तुमच्या करुणाछायेचा सहवासी काळ दडवून ठेवत बंद झाली. या वास्तव व्यवहारी काळापर्यंत कसे स्थलांतर झाले हे कळले सुद्धा नाही.धड्यांची उलटून गेलेली ती पाने पुन्हा उघडता येतील का? 

                सर मला समजलं की शिक्षण हे विविध अभ्यासशाखांच्या अमर्याद अनुभवांच शास्त्र आहे. तपस्या ही त्यासाठी आलीच. आज शक्य तेवढं शिकण्याचा मी प्रयत्न करतोय. महाविद्यालयीन शिक्षण प्रवाहात मीसुद्धा सहभागी होत आहे. आपण शिकविलेले माझ्या पूर्वीचे... बरोबरीचे.. त्यानंतरचे कित्येक विद्यार्थी त्यात निपूण देखील बनले. अजूनही आपले तद्उद्देशी कर्तव्यक्रमण चालूच आहे. तुमचे विद्यार्थी शिक्षण प्राप्तीसाठी जे प्रयत्न करतात ; त्या प्रयत्नांना इतरजण कौतुकस्पदतेने तपस्या मानतात. तुमच्या विद्यार्थ्यांना मात्र ती 'तपस्या ' मुळीच वाटत नाही. हे श्रेय केवळ तुमचेच आहे. कारण आपणच या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभतेचं बनवलं. 'शिक्षण प्राप्ती म्हणजे आनंदानुभूती ; जिज्ञासापुर्ती 'अशी प्रेरणासूत्रे देऊन  प्रयत्नसार्थकते साठीचे नवनवे मार्ग त्यांच्या दृष्टीस आणले.

    सर माझ्या जीवनात आपला किती प्रभाव पडला म्हणून सांगू ! आज माझ्याजवळ जे काही आहे ; ते आपले आहे. आपणच ते माझ्यात भरले. मी ओतप्रोत भरावा यासाठीच आपले प्रयत्न चालत. बुद्धीचे भांडे घेऊनच आम्ही विद्यार्थी शाळेत येत होतो. ते शिक्षणाने, ज्ञानाने भरावे या जाणिवेने आपणाकडून ज्ञानस्रोत चालू होते. कुणी आपले भांडे भरून घेतले? किती भरले? कुणी ते त्या स्रोत धारेखाली धरले होते? यांसारख्या प्रश्नांच्या उत्तरात विद्यार्थ्यांची यशस्वीतता अवलंबून असते. नुकसानकारक अल्लडता कदापिही माझ्यात नव्हती ;  असे मी मुळीच म्हणणार नाही. 'विद्यार्थीसुद्धा कुठे चुकू शकतो ?' याबाबत आलेल्या जाणिवेची कबुली द्यावी म्हणून हे सांगितले. अधूनमधून लागणार्‍या ठेचांनी हे सारं सारं आठवतं . त्यातून विद्यार्थ्यांनी पाळावयाच्या आवश्यक कर्तव्यांच स्वरूप समजतं.

         सर, त्या वेळी आपण ' तहानलेल्या घोड्याचा ' जो दाखला द्यायचे. तो  नेहमीच आठवणीत आहे. या घोड्यास केवळ पाण्याजवळ नेण्याचेच मालकाचे कर्तव्य असते. पाणी प्यायचे अथवा नाही हे त्या प्राण्याला ठरवावे लागते. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या यांसारख्या दाखल्यांचे अर्थानुकूल गांभीर्य त्यांनी वेळीच समजून घेतले तर! त्यांना ते उमजले तर! 

            सर शाळेच्या बाहेर धकाधकीने आणि व्यवहाराने सर्वाधिक जीवन व्यापून गेलं आहे . अशा या जीवनात सुखस्थैर्याची , आत्मसुखाची आश्रयस्थाने मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा चालू आहे. माणसांची अनेक रूपं पाहण्याचा अनुभव नित्याचाच झाला आहे .आज हे सारं कळतय .कदाचित हे सारं 'काही'च्याच मात्रेत असेल. याशिवाय कळायच्या गोष्टी अजूनही बऱ्याच शिल्लक असतील. हे देखील मी गृहीत धरून आहे. शाळकरी बनून आपल्या कृपाछत्रात विसावताना या सर्व गोष्टींची धग मला लागली नाही. आपण ती लागू दिली नाही. मला सांभाळलं. माझं बालपण सांभाळलं. 

       शालेयजीवना सोबत आपला सहवासीकाळ संपायला नको होता; अशी इच्छा सतत मनात बाळगून मी आपणांस दुःखी करणार नाही. कर्तव्य पराङमुख होणार नाही. भावनेपेक्षा श्रेष्ठ असलेल्या कर्तव्याचा तुम्ही शिकवलेला धडा मी विसरणार नाही. बाहेरच्या जगात वावरण्यासाठी माझ्या पावलांना तुम्ही दिलेल्या उभारीच्या, चैतन्याच्या बळावर मी चालणार आहे.

                तुमच्या आशीर्वादाचे

                   तुमच्या शिक्षणाचे

                सत्यबळ अंतःकरणात घेऊन ;

                    या व्यवहारात

                     या धकाधकीत 

                    मी चालणार आहे 

                    अगदी निर्भय होऊन!

                    

                                         

                                  आपल्या आशीर्वादातला शिष्य


                                              सुरेश दगडू भिंगारदिवे

                                                राहाता,अहमदनगर

बापदादाचं निघून जाणं

 *बापदादाचं निघून जाणं*

पोक्त-प्रौढ वयातही ज्या बापाच्या जीवावर मी अल्लड-आनंददायी पोरपण अनुभवलं.त्या बापाचा जीव माझी नजर चुकवून निघून गेला.लहानपणी सोबत यायचा हट्ट माझ्याकडून होऊ नये म्हणून हुलकावणी देऊन तो बाहेर पडायचा. पण तेव्हा संध्याकाळी का होईना तो घरी यायचा.त्यामुळे त्याची वाट पाहता यायची.आता आयुष्याची संध्याकाळ होऊ पर्यंतही तो येणार नाही.मी त्याची वाट कशी पाहू?

         पायांनी विकलांग झालेला माझा बाप घरात बसून घर चालवत होता.नव्यानेच बसायला शिकलेलं बाळ हर्षोल्लासाने रांगत-रांगत घरभर फिरतं तसा स्वयंभू 

प्रसन्न मुद्रेने तो घरात-अंगणात वावरत असायचा.

सुरवातीपासूनच काही व्यसन नसल्याने मी एवढा जगतोआहे.अशी शुचिर्भूत कारणमीमांसा तो नेहमीच द्यायचा. तो जीवन कंठत नव्हता ; तर आनंदाने जगण्याला उत्सवी रुप देत होता. दोन रेडिओ, जुन्या जमान्यातील लठ्ठ दूरदर्शन संच, डिव्हीडी प्लेअर आणि पुष्कळशा ध्वनि-दृश्य तबकड्या आदि साधनात तो स्वतःला ध्यानमग्न ठेवायचा.पंडित विष्णू शर्मांच संस्कृत-मराठी ' पंचतंत्र ' , जाड टाइपातील ' बायबल ' अधूनमधून वाचायचा.सत्तरी ओलांडून देखील विना चष्म्याचे याने राहू नये. मोतीबिंदूच्या अतिपक्वतेचा दोष उद्भवून ; अंधत्वाने याला स्थानबद्ध करु नये.यासाठी मी त्याला नेत्रतज्ज्ञाकडे जाण्याबद्दल बोलायचो.पण तो ऐकत नसे.जाडजूड  भिंगाची काच घेऊनच वाचत रहायचा.आज भिंगाची काच टेबलावर पडून आहे.तो मात्र दृष्टीआड गेला आहे.

        लहानपणी सायकलवर त्याच्यासोबत श्रीरामपूरला जायचो.' किशोर' ,' वसंत'  'लक्ष्मी' या चित्रपटगृहात चित्रपट पहायचो.दिवाळीच्या दिवशी फटाके घ्यायचो. रामनवमी,ऊरुसात रात्रीचा कव्वाली कार्यक्रम ऐकायला तिथेच मुक्कामी थांबायचो.त्याच्या मांडीवर निवांत  झोपायचो.

घरी आकाशवाणी विविध भारती ऐकून चित्रपटांची,त्यातल्या गीतांची विस्तृत सूची त्याजकडे असायची.आधी - मध्ये संस्कृत श्लोक ऐकवून मराठीत समजावून सांगायचा.इंग्लिश-मराठी डिक्शनरीतून शब्दशोधन करायला शिकवायचा.शाळेच्या सुट्टीसाठीची चिठ्ठी सुरेख-सुवाच्च्य अक्षरात लिहून द्यायचा. 

तो खूपच सुखी होता असेही काही नव्हते. त्याच्या आईवडिलांना, भाऊ-बहिणींना पोटाची गुजराण कित्येकदा घरातील पितळी भांडी गहाण ठेवून करावी लागे.जमेल तसा कर्तव्यभार महिन्याच्या पगारातून तो देखील तसा उचलायचा.त्याचीआई गेली तेव्हा अहमदनगरला जायला त्याची खूप परवड झाली.बापाच्या वेळी तर व्यसनी नातेवाईकाने त्याला घेऊन येतो असे म्हणून गाडी भाडे घेतले व ते दारुत उडवले.बाप गेल्याचे त्याला दुसऱ्या दिवशी समजले. त्याच्या बापाचे अंतिम दर्शनही त्याला मिळाले नाही. भाऊ, बहीण यांच्या निधनाचे दुःखही पचवावे लागले.पण मला तो कधीच रडताना दिसला नाही. आयुष्यभर त्याच्या डोळ्यात मी कधीच पाणी पाहिले नाही.त्याच्या जाण्याच्या आधील दिवशी पापण्या उघडण्याचे त्राण त्याच्यात नव्हते. मात्र मिटलेल्या डोळ्यांवर अश्रुपिंडातील खोलवरचा बाहेर आलेला चिकट ओलावा माझ्या बोटांना लागला.आई तसेच दोन्ही बहिणी संसर्गित झाल्याचे व त्यांना उपचार केंद्रात हलविल्याबद्दल मीच त्याला सांगितले. कदाचित म्हणूनच निग्रहाने अडविलेल्या अश्रुधारा त्याच्या डोळ्यांबाहेर पडल्या असाव्यात. तो धक्का मी त्याला द्यायला नको होता.असे वाटते.पण रडण्याचा हुंदका दुःखाच्या ओझ्याखाली दबण्यापासून वाचवतो.लवकर बरे होऊन घरी जायचे व तिथे सर्वांनी भेटायचे. असा विश्वास त्याच्यात मला जागवायचा होता की  सर्वांच्या दुखण्याला त्रासून आई,बहिणींचे बाधितपण मी लहान बनून त्याच्याजवळ सांगितले ? हे समजण्यापलिकडचे आहे. त्याला ते कळायला नको होते.पण माझ्याकडून ते त्याला समजले.ही माझी हतबलता,हा माझा कमकुवतपणा मला लपवणे,नाकारणे शक्यच नाही. आजाराने सगळ्यांना दवाखान्यात आणले. घर ओस पाडले.बापाला दवाखान्यात टाकून थोड्या वेळासाठी घरी आलो.बंद घर चोरट्यांनी फोडू नये.फोडले तर त्यांच्या हाती काही लागू नये अशा उद्देशाने बापाची संदूक उघडली.पंचवीस हजारांच पुडकं त्यात सापडल. त्याला छातीशी कवटाळून बराच वेळ रडत राहिलो. दवाखान्यात येताना ते सोबत घेतले.स्वतःचे म्हणून काहीच पैसे जवळ नव्हते. टाळेबंदीत ते मिळणे कठीण होते.सकाळी  बाप निष्प्राण झाला. सरकारी दवाखान्यात तडफडून मेला.आरोग्य सेवकाचे काम करुन सरकारी दवाखान्यातूनच तो देखील सेवानिवृत्त झालेला होता. सगळी सरकारी यंत्रणा किंवा प्रत्येकच सरकारी दवाखाना यांना मला दूषण द्यायचे नाही. पण या पवित्र क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींचा , त्यांच्या म्होरक्यांचा जिथे वावर आहे अशा दवाखान्यात दुर्दैवाने माझा बाप अडकला. रात्रभर वेदनांनी तळमळताना इथला कोणताही रात्रपाळीचा योद्धा त्याच्याजवळ आला नाही. समुपदेशन-समाधानाच सांत्वन किंवा वास्तवस्थितीच प्रकटन माझ्याकडे केलं नाही.कोऱ्या केसपेपर्सवर सह्या घ्यायला मात्र विसरले नाहीत . त्याची कोंडलेली लघवी बाहेर काढण्यासाठी खूप विनवणी केली.पण निष्ठुरांना दया आली नाही.त्याचा जायचा प्रवास देखील त्यांनी सुखाचा होऊ दिला नाही. रात्रीच्या एक-दिड पर्यंत खाजगी मेवा कमावणाऱ्या ; खाजगी टोळ्यात सक्रिय असणाऱ्या इथल्या स्वयंघोषित सरकारी योद्ध्यांनी माझ्या बापाचे रक्षण केले नाही. आणि मी  त्याच्याच पेटीतल्या पंचवीस हजारातील रक्कमेने त्याला मातीआड लपवले.

        बापाच आभाळछत्र हरपून रखरखीत उन्हाचे चटके आता देही-ह्रदयी दाह देत आहेत.

                                               सुरेश भिंगारदिवे

                                                   श्रीरामपूर

बापाची आठवण

 बापाची आठवण


    आता दिवस मोजत मरुपर्यंत

    बापा तुझी आठवण नाही संपत


    तुझा अन्नरस सत्वशील भारी

    त्याची उभारी;त्याची शिदोरी

    मी घेऊन फुललो,तू झिजला कष्टत

    बापा तुझी आठवण नाही संपत

    

     निःसंगता तुझी यापुढची

    पोकळी पोरक्या रितेपणाची

    आमरण काहिली घरघर, साहून मी जीवंत

    बापा तुझी आठवण नाही संपत


    घर अन् धनाचा , तू दिला दायभाग

    आणि वाढलेली , तुझी संपन्न बाग

    जाळली हकिम खळांनी , ज्यांचे विषारी हस्त

    बापा तुझी आठवण नाही संपत


                        - सुरेश भिंगारदिवे

                            श्रीरामपूर

सेवानिवृत्ती प्रित्यर्थचे सन्मानपत्र

 " तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे. "

सन्माननीय,
मानवेल बाबुराव सोनवणे,
                ज्ञानाचे वर्णिलेले उपरोक्त लाभ आपल्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावेत अशीच उदात्त ध्येयासक्ती प्रत्येक शिक्षकाच्या अंतर्यामी संस्कृतीने अपेक्षिलेली आहे.अशा सद्गुरु - संस्कारप्रभू , प्रत्यक्ष विद्यार्थीवर्गाच्या-परिप्रेक्ष्यात कार्यरत राहिलेल्या ; शिक्षणकर्मी तज्ज्ञांच्या मांदियाळीतील अध्वर्यू : कर्मवीर अण्णा यांनी  'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना केली. आशिया खंडातील सर्वात मोठ्या संस्थेचे मानक वैशिष्ट्य प्राप्त केलेल्या रयत परिवारातील  राहाता, गणेशनगर व श्रीरामपूर या शाखांमध्ये आपण अध्यापनाचे कार्य केलेत.
दि.२२ऑगस्ट१९८८ ते दि.३१ मे २०२१ पर्यंतच्या  सुमारे तेहतीस वर्षीय सेवा कालात  राष्ट्रप्रेमाचे धडे देणाऱ्या एन.सी.सी. विभागप्रमुख पदाची जबाबदारी देखील आपण पंचवीस वर्षे सक्षमपणे सांभाळली.
ज्ञानदानासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व ग्रामस्वच्छता अभियान आदिंसारख्या शासनप्रेरित विधायक सामाजिक उपक्रमात उल्लेखनीय सहभागही घेतला. शिस्तप्रिय पण मनमिळाऊ ; शांत व मितभाषी असा आपला स्वभाव असल्याने 'अजातशत्रू' म्हणून आपण ज्ञात आहात. मातृभाषा:मराठीचे अध्यापन  करत असताना सृजनानंद देणाऱ्या ललितकलादि संस्कारांचा प्रभावही आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक संस्कारित केलात. संस्थेच्या उच्च आदर्श मूल्यांना अनुसरून आपण अंगिकारलेली व विद्यार्थ्यांत प्रसृत केलेली निष्ठा,बांधिलकी संस्थेच्या भविष्यकालीन नावलौकिकात वाढ करण्यास निश्चितच पूरक ठरेल. आपल्या सेवापूर्ती प्रसंगा प्रित्यर्थ हे सन्मानपत्र आपणास प्रदान करताना म्हणूनच खूप आनंद होत आहे. भविष्यकालीन आरोग्यदायी संतृप्त वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
         रयत शिक्षण संस्थेचे
         डी डी काचोळे विद्यालय श्रीरामपूर,
         जिल्हा -अहमदनगर

बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

आठवणीतील गजभीव गुरुजी

 *आठवणीतील 'गजभीव'गुरुजी*


हरेगावला संत तेरेजा शाळेत पहिल्या इयत्तेत असताना; आमच्या वर्गशिक्षिका रजेवर गेलेल्या असतील तेव्हा आमची रवानगी हमखास गजभीव गुरुजींच्या वर्गात व्हायची.त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाची खूप भीती तेव्हा वाटायची. एकदा माझ्या कडे पाठ करून बसलेल्या वर्गमित्राच्या शर्टाला मी दोरीची शेपटी बांधत असतानाच ; माझ्या उघड्या मांडीवर गुरुजींची छडी पडली.मांजराच्या तंद्रीतले माझे डोळे खाडकन उघडले. त्यानंतर असले खटाटोप करताना मला नेहमी गुरुजीच समोर दिसायचे. अशा कडक व्यक्तींची शाबासकी मिळवण्यासाठीही तेव्हा अभ्यासात हुशार व्हायची प्रेरणा मिळे.थोडी फार हुशारी त्यापुढे मी मिळवली सुद्धा!आणि गुरुजींची शाबासकीही!

        ' गुलाब ' नावाचा मुलगा होता...

          घरातुनी कामाला निघाला.

          लाकूड फोडिता लागले पायाला

          हूँ..हूँ..हूँ..हूँ रडत बसला.

           

          ' गुलाब 'नावाचा मुलगा होता...

            घरातुनी कामाला निघाला.

          गवत कापता लागले बोटाला..

          .हूँ..हूँ..हूँ..हूँ रडत बसला। "

                                 हे गाणे आम्हांला शिकवताना गुरुजी खूप तल्लीन व्हायचे.

त्यांचा स्वर गाण्यातल्या 'गुलाब' नामक मुलाच्या वेदनांनी      सद्गदीत..रडवेला झाल्याचे आम्हाला जाणवायचे. 

     त्यांच्या कडक शिस्तीचे मनावर पडलेले दडपण त्यावेळी कुठच्या कुठे हलके होई.

पुढच्या इयत्तेत जाऊपर्यंत भार पेलण्याची शक्ती देण्यासाठी त्यांचा हात कधी खांद्यावर पडू लागला हे कळलेही नाही.

        २००२ सालातल्या मे महिन्यात ; माझ्या लग्नात त्यांनी पुन्हा माझ्या खांद्यावर  हातांनी थोपटत शाबासकी दिली.पुढील संसारिक, व्यवहारीक आघाड्यांवर लढण्यासाठी आशीर्वादरुपी उर्जा पुरवली.शिवाय त्या दिवशी  लग्न मंडपातून माझा निरोप घेताना , लहान,निर्व्याज बालकाला कवेत घेतल्याप्रमाणे मला जवळ करत त्यांनी माझे चूंबन घेतले.विद्यार्थ्याला मिळणारे असे निखळ गुरुप्रेम किती भाग्यवंतांच्या नशिबात असेल ; कोण जाणे ? 

     पण मला ते भेटले.त्यांच्या त्या स्मृतींचे सुधासिंचन मला आमरण तृप्त करणारे असे आहे.गुरुजींच्या पवित्र स्मृतीस माझा सविनय प्रणाम.

     त्यांच्या आशीर्वादातला विद्यार्थी

         सुरेश दगडू भिंगारदिवे

         अशोकनगर फाटा, श्रीरामपूर

संस्कारदायी उर्जास्त्रोताची अखेर

            

           हरेगाव येथे 'संत तेरेजा' या नावाने जितकी म्हणून शैक्षणिक संकुले आज कार्यरत आहेत ; त्या प्रत्येकास एक देदिप्यमान अशी परंपरा आहे. कर्मकांडांना व भेदभावजन्य अमानुषतेला निष्प्रभ करणारा ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा समतावादी अध्यात्म विचार या परंपरेच्या मुळाशी आहे. वैयक्तिक पातळीवरील सुखोपभोगांना  तिलांजली दिलेल्या व इथल्या भूमीत ख्रिस्त प्रेरित जीवनमार्गाची मुहूर्त मेढ रोवलेल्या निर्मोही निरपेक्ष पाईकजनांच्या स्मृतीशेष होण्यानंतरही या मिशनरी शाळेची परंपरा आणि प्रभाव आजही टिकून आहे ; तो एतद्देशीय धर्मगुरू व शिक्षकगण यांच्यामुळेच होय. अशा शाळेतील मुले शिकतात. जीवनात उभी राहतात. जीवनाला सामोरी जातात. उन्नती उत्थानाच्या प्राप्तीसाठी शिक्षणाचा मंगल यज्ञ ती चालूच ठेवतात. सद्गुरु शिक्षक-शिक्षिका यांचा आश्वासक आधार यात ऊर्जा पुरविण्याचे कार्य करत असतो. अशा बव्हंशी उत्कृष्ट शिक्षकवर्गामुळे शाळा नावारूपास येते. अशी निष्ठावान,ध्येयप्रधान शिक्षक पिढीच शाळेची ओळख म्हणून गृहीत धरल्या जाते.' बोधक 'तथा 'राठोड' मॅडम यांनी आपल्या सेवाकालात ही परंपरा व्रतस्थपणे पुढे नेली. माता-पित्याकडील' बोधक ' तर गृहस्थाश्रमातील ' राठोड ' अशा दोन्ही आडनावांपेक्षा 'चंदा मॅडम ' म्हणूनच त्या विद्यार्थ्यांत अधिक परिचित होत्या. विद्यार्थ्यांविषयीची ममत्व प्रधान बांधिलकी, प्राप्त कर्तव्याबद्दलची निष्ठा, सेवा देत असलेल्या मातृसंस्थेबद्दलचा उदार दृष्टिकोन आदि व्यक्तित्ववैशिष्ट्यांमुळे विद्यार्थीवर्ग त्यांचा मनोभावे आदर करत. तीस एकतीस वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन १९८९-९० या शैक्षणिक वर्षापासून आपल्या शालेय कामकाजास त्यांनी प्रारंभ केला होता. आठवी ते दहावी पर्यंतच्या वर्गांना इंग्रजी शिकविण्याची जबाबदारी संस्थेने त्यांना दिली होती. संस्थेतील शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांची गुणवत्ता इंग्रजी,गणित विषयातील गुणांकनाच्या मोजपट्टीनेच त्या काळीदेखील मापली जात. या विषयांचे शिक्षक जरी उदार मनस्क असले तरीही ठरवून दिलेल्या पाठ्यक्रमा नुसार अध्ययन-अध्यापन होताना इंग्रजी गणितातील पूर्वग्रह दूषित कठीणता शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनःस्थितीचा ताबा घेते. मुक्त संवाद आणि संस्कार संस्करणाला मर्यादा पडण्याची बाधा त्यामुळे निर्माण होते. चाकोरीबद्ध मूल्यमापनाचे निकष पूर्णत्वास नेणारी इंग्रजी गणिताची गुण मात्रा वाढवण्याच्या प्रयत्नात या विषयांच्या शिक्षक विद्यार्थ्यांत यांत्रिकपणा निर्माण होतो. या विषयांबद्दलच्या एकतर्फी कटूतेने ग्रस्त होऊन विद्यार्थी निराश होतो.कधी कधी शिक्षण थांबवतो. अशा सर्व मर्यादांचे भेदन करण्याची सृजनशील क्षमता मॅडम यांच्याकडे होती. इंग्रजी विषयाचे शिक्षण आमच्यासाठी त्यांनी आनंददायक बनवले. गेल्या तीस एकतीस वर्षांच्या काळात 'संत तेरेजा माध्यमिक शाळेत' शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिक्षणाची सुलभीकरण तंत्रे मॅडमच्या मार्गदर्शनाने आत्मसात केली आहेत. यापुढील महोदय शिक्षक आचार्यांसाठी हा नावलौकिक आदर्शावह ठरावा. कोणत्याही प्रांतातल्या संस्थेत, शाळेत अशी तंत्र-कौशल्ये अनुकरणीयच असतात.
     इयत्ता आठवी ते दहावी वर्गांमधून शिक्षण घेणारा हा विद्यार्थी वर्ग १४ ते १६ वयोगटातील असतो. शारीरिक आणि मानसिक पातळीवर घडणाऱ्या अनेक बदलांचे या वयात योग्य व्यवस्थापन न झाल्यास ही मुले दिशाहीन होतात.भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी वर्तनकृत्ये या काळात त्यांच्याकडून घडू शकतात.म्हणून त्यांना समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र अशा मनोभ्यासक मार्गदर्शकांची गरज असते. ही जबाबदारी मॅडम यांनी स्वतः होऊन शाळेत स्वीकारली होती. मानसिक पातळीवर अनेक संघर्षांचा अनुभव करत असलेली मुलं त्यांनी समुपदेशनाने संतुलित केल्याची उदाहरणे आम्ही पाहिली आहेत. मार्गदर्शनाचा आश्वासक आधार मॅडम कडून विद्यार्थ्यांना मिळे.
           नवव्या इयत्तेत असताना जुन्या अभिजात अशा ' दोस्ती '
चित्रपटाचे कथानक त्यांनी आम्हाला सांगितले होते. निखळ मित्रत्व , बंधुभाव आचरण्याचा निष्कपट मूल्य संस्कार त्यानिमित्ताने त्यांनी आमच्यात संस्कारित केला होता. ही जाणीव आज प्रकर्षाने होत आहे.त्या चित्रपटातील
"राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है
दुःख तो अपना साथी है।"
    या गीतपंक्तिंचे गुंजारव ऐकल्याचे भास मला आजही होतात. सुख दुःखातील खंबीर प्रगल्भता प्राप्त होण्यासाठी मॅडम यांनी सांगितलेली ती कथा मी मुद्दामच आठवत असतो.
     रविवारची उपासना किंवा त्यादिवशी शाळेने आयोजिलेल्या संस्कार वर्गास उपस्थित राहावे याबाबत त्या आग्रही असत. रविवारच्या साप्ताहिक उपासनेला गैरहजर राहण्याच्या चुकीचे परिमार्जन दररोजच्या सकाळ उपासनेत उपस्थित राहून करावे असा शिक्षावजा आदेश त्या देत असत. मनाचे संस्करण, आत्म्याचे उन्नयन घडवणारी ती 'शिक्षा' वस्तुतः दंड स्वरूपी शिक्षा नव्हतीच. आयुष्याला सुखकारक बनवणारा , समत्व देणारा तो 'ध्यानयोग' होता.आम्ही त्याला दंड मानण्याची समजूत त्यावेळी केली होती. ही चूक आज जाणवते.मनात अपराधीपणाचे शल्य टोचते.
      काव्यशास्त्र विनोदाच्या अभ्यासात सुज्ञ मनुष्याचे जीवन चांगल्या प्रकारे व्यतित होते. मूर्ख मनुष्य मात्र व्यसनाधीनता झोप आणि कलहात आपले जीवन संपवत असतो. सध्या दृढ झालेल्या या जाणीवेचे मूळ मॅडम यांच्या शिकवण्यात होते. त्याकाळी देखील आकाशवाणीवरील चांगल्या कार्यक्रमांची,
परिसरात,श्रीरामपूर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची पूर्वसूचना  देऊन योग्य वेळी आम्हाला त्या अवगत करत.
     सृजनात्मक लेखनाच्या कलात्मक आनंदाशी आमचा परिचय आम्ही विद्यार्थी असतानाच मॅडम यांनी घडवून दिला. परिसरातील नवोदित जाणकार लेखकांशी आमचा संवाद होईल अशा शाळापूरक कार्यक्रमांचे नियोजन त्या जाणीवपूर्वक आखत व अंमलात आणत. वाचन लेखनातून आनंद आणि अभिव्यक्तिची कला मिळविण्याचा त्यांनी जो राजमार्ग आम्हाला त्या काळी दाखवला ; त्यावर प्राप्त कुवतीनुसार गोगलगायीच्या गतीने का होईना मी 'अक्षर' प्रकटीकरण करत असतो.
   मॅडम रहिवासी असलेल्या गावी मला स्थायिक होण्याचा योग आला.एका संस्थेच्या किंवा पक्षाच्या निवडणुकीत मतदान करावे म्हणून काही कार्यकर्त्यांनी मला व माझ्या कुटुंबियांना काही रक्कम देऊ केली ; स्वाभाविकच मी ती नाकारली. ही बाब नेमकी मॅडम यांना समजली. यथावकाश एकदा एसटी बस मध्ये माझी त्यांच्याशी भेट झाली.त्या घटनेचा उल्लेख करून
"तू माझा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे." असे गौरवोद्गार माझ्याबाबत काढून त्यांनी मला आशीर्वाद दिला. मूलतः असे शिक्षक लाभलेल्या कोणत्या विद्यार्थ्याचे पाऊल आयुष्यात चुकीचे पडेल ? मॅडम आमच्या आदर्श मूल्यशिक्षिका होत्या.
      मॅडम यांनी बांधलेल्या नवीन घराच्या उद्घाटन प्रसंगी मी उपस्थित होतो. एक कोरी, साधी, वही स्वरूपातील डायरी  त्यादिवशी मी त्यांना दिली. "कोरी पाने समोर घेऊन बसलेला किंवा ती जवळ बाळगणारा नेहमीच उदात्ततेने भारलेला असतो."  श्रेष्ठ लेखक रवींद्र पिंगे यांचे हे अवतरण अनुभवण्याची वा समजण्याची पात्रता मी मॅडम मुळे मिळवू शकलो हा भाव त्यादिवशी मनात होता. त्या डायरीच्या भेटीबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. मला आशीर्वादही दिला. नवीन घरातील वास्तव्याचा खूपच कमी लाभ मॅडम यांना मिळाला.आणि कुटुंबियांना मॅडमचा.ही बाब मनाला वेदना देते.
      पुढील वर्षी म्हणजे इ.स.२०२२ मध्ये मॅडम सेवानिवृत्त होणार होत्या.त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रकट होणाऱ्या कार्य ऊर्जेचा उत्फुल्ल साक्षात्कार शाळेने, त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांनी, प्रत्यक्षात मॅडमच्या कुटुंबियांनी अनुभवलेला आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात होणारी त्यांची सेवानिवृत्ती कुणाला खरी वाटत नव्हती. त्यांच्या दुर्दम्य आनंदोत्साही वृत्तीला  'रिटायरमेंट ' मर्यादा घालू शकली नसती. तो काळ विशेष करून त्यांच्या कुटुंबियांसाठी वरदान स्वरूप ठरला असता. मात्र त्यापूर्वीच महामारीत उद्भवलेल्या नैसर्गिक,सांसर्गिक वा यंत्रणाजन्य अरिष्टामुळे त्यांचा दुर्दैवी बळी जावा हे असहनीय असे दुःख आहे. ते पेलण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांस देवो. मॅडमच्या जाण्याने एका संस्कारदायी ऊर्जास्रोतांची अखेर झाली. मात्र त्यांनी घडविलेल्या , संस्कारित केलेल्या असंख्य विद्यार्थ्यांमधील विद्येच्या अमूर्त शिल्पाकृती अस्तित्वात राहणार आहेत.त्यांनी शिकविलेल्या पाठांची सत्वऊर्जा माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांमधून सचेतन राहणार आहे. यासारख्या भावनिक सांत्वनाने त्यांच्या अभावाची निर्माण झालेली पोकळी त्यांच्या परिवारात भरून निघणार नाही. ही जाणीवआहे ; मात्र त्यांच्या सहवासातील मंगलमय क्षणांच्या , आनंददायक प्रसंगांच्या संधिप्रकाशात दुःखावेगाची तीव्रता कमी व्हावी हा आशावाद स्वीकारण्याशिवाय नियतीने आपल्याकडे पर्याय ठेवलेला नाही. त्या आशावादाला परमेश्वराने सांत्वनाचा आधार ; धीराचा आत्मा द्यावा. या प्रार्थनेसह माझ्या मातृहृदयी शिक्षिका चंदा मॅडम यांना मी आदरांजली अर्पण करतो.
                                          त्यांच्या आशीर्वादातला शिष्य
                                                  -सुरेश भिंगारदिवे

पत्रविषय:ध्यान

      गुरुवर्य सावंत सर,

             हरीओम.

आनंदयात्रेचा प्रवास क्लेशमुक्त व्हावा अथवा त्या क्लेशांशी निर्विघ्नतेने प्रतिशह देता यावा,क्लेशदूरस्थता साधता यावी,क्लेशांना निकामी करता यावे यादृष्टीने महामुनी पतंजलीकृत योगदर्शनातील योगसूत्रांचे प्रत्ययकारी असे विवेचन आपण करत आहात. क्लेशमुक्तीचे उपाय किती सोपे आहेत हा विश्वास यामाध्यमातून मिळतो आहे. आजच्या प्रस्तुत विवेचनातून ध्यान करण्याचे विधायक,विलक्षण लाभ सांगतानाच गीतेतील चिरंतन अक्षरमूल्यांचा संदर्भ देत सोप्या पद्धतीचा ध्यानशिक्षणपाठही अध्यापिला आहे.ध्यानसाधकांची ध्यानश्रद्धा,ध्यानबैठकही यामुळे दृढ होईल.क्लेशमुक्तीसाठी  पतंजली ऋषींनी सांगितलेल्या ध्यान करण्याच्या अपरिहार्यतेची जाणीवजागृती आपण या भागातून प्रभावीपणे केली आहे.खूप खूप आभार. शुभेच्छा.🙏🙏🙏

क्वारंटाइन डेज

 आठवण केलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.व्यस्त दिनक्रम वा व्यवहारी जगाच्या 'भाऊ'गर्दीत आपोआप पुढे पुढे लोटले जात असतानाही मनातल्या मित्रत्वी संवेदनांचे संचित मस्तिष्काच्या परमाणूपोकळीत ओझं म्हणून नाही ; तर ऊर्जा म्हणून सदोदित स्थित आहे. देह तेवढा घाईच्या धबडग्यात पळतो आहे.आपली विश्रांतीस्थळे नियतीच्या गतीमुळे सध्यातरी दोन ध्रुवावर आहेत.त्यामुळे परस्परांना  दुर्मिळ वगैरे झालो असू ; गायब मात्र आत्ताच नाही.आहे त्या ठिकाणीआपापलेअस्तित्व टिकवून ठेवत स्थिर राहू.

                                                                          सुरेश भिंगारदिवे,राहाता

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...