फॉलोअर

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्या एका मित्राने "आता तुम्हाला शहाणपण येईल "अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. 'चाळीशी नंतरचा आयुष्यकाल कठीण असतो' असा मतितार्थ कदाचित त्याच्या बोलण्यामागे असावा.      2025 पर्यंतच्या या दहा वर्षांतील कालावधीत त्याची ती शुभेच्छावजा खोचक प्रतिक्रिया अधिकाधिक फलद्रूप होताना मी पाहत आलो. अनुभवत आलो. साहत आलो.मन बुद्धीचा विवेकी पिंड घडविणाऱ्या कठीण परिस्थिती विषयी कृतज्ञता बाळगत आलो.कर्तव्यकर्मांच्या  का होईना या अपरिहार्य प्रवाहात वाहवत जाताना पुष्कळांचा संपर्क कमी झाला. तुटला. औपचारिक बनला. अत्याधुनिक संप्रेषण प्रणालीतल्या अनेक समुहात असूनही नसल्यासारखी माझी स्थितिशीलता *"हे  आपल्या समुहात आहेत का"* अशा सांशक, उपहासादी उद्धरणांनी प्रत्ययास आली.

             वाघ सिंहादि हिंस्त्र पशूंचा खेळ घेताना सर्कशीच्या तंबूतील वीज गेली. रिंगमास्टर आक्रमक  प्राण्यांत अडकला. थोड्याच वेळात हाहाःकार उडेल अशी स्थिती असताना कोणत्यातरी दैवी दृष्टीच्या माणसाने प्रकाश पाडणारी काडी चेतवावी. त्याचे अनुकरण उर्वरित समुहाने करावे. रिंगमास्टरला जीवघेण्या अरिष्टापासून वाचवावे. तशा कोणत्यातरी शुभचिंतक,सहृदयी मित्र स्नेह्याने लक्षात ठेवलेला वाढदिवस त्याच्या एका शुभेच्छेने सार्वजनिक व्हावा. असे आज माझ्याबाबतीत घडले. या दिवशी आपणा सर्व; मित्र-स्नेहीजनांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात. आपल्या गुरुवर्यांचाही शुभेच्छारुपी आशीर्वाद मिळाला. खरोखरच गुरुंशी असलेले नाते हे आजीवन असते. कौतुक प्रशंसेची, विविध उपमा-उपमानांची स्तुतीसुमने उदात्त वृत्तीने माझ्या ओंजळीत आपणां सर्वांनी टाकलीत. डॉ. नसतानाही तशी उपाधी दिलीत.अंतःकरणपूर्वक आपण प्रदान केलेली सदभावनांची ही सत्वशक्ती ; माझ्या आयुष्यात घडणार्‍या घटना प्रसंगात मनाचे समत्व राखण्यास मला  बळ देईल. आपल्या या अफेड देयदाना बद्दल मी आपला कृतज्ञ आहे. 

विश्व मंडलात सर्व काही संग्रही राहते. म्हणूनच वाढदिवशी माझ्यासाठी आपण व्यक्त केलेल्या शुभेच्छा विश्व मंडलात सुरक्षा ठेव म्हणून माझ्यासाठी सुरक्षित असणार आहे त्यांचा सुपरिणाम आपणांसही मिळो या कृतज्ञतेसह, शुभेच्छांसह आपणांस धन्यवाद देतो .

       आपला सहाध्यायी, विद्यार्थी 

        सुरेश भिंगारदिवे,

शुक्रवार, ३० मे, २०२५

प्रवरामाई

 


The Centenary of the Lake Arthur Hill

 





ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आता
 विकास पवार लिखित भंडारद-याची धरणगाथा 

      "मृत्यूनंतर मी नरकात गेलोतरी चांगल्या पुस्तकांच्या माध्यमातून तिथेही स्वर्ग निर्माण करेल" स्वातंत्र्य संग्रामातील टिळकयुगाचे अध्वर्यू ज्यांना म्हटल्या जाते त्या लोकमान्यांचे हे उद्गार आहेत.

        ग्रंथसंग्रह करण्याची व तो संग्रह जतन करण्यासाठीच विशेषकरून वास्तू बांधण्याची अद्वितीय अध्ययनशीलता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर जोपासली. 'ग्रंथ हेच गुरु' या उद्धरणाची सत्यता तिन्ही काळात, युगानुयुगे सर्व जगात अबाधित आहे. या ग्रंथ गुरूंच्या जागतिक विद्यापीठाचा दर्जा ऑक्सफर्ड विद्यापीठातील ग्रंथालयाला दिल्या जातो. पृथ्वीवरील या ग्रंथरुपी महागुरूंच्या दालनात इतिहास संशोधक श्री विकास पवार यांच्या Century of the Lake Arthur Hill या ग्रंथास दाखल होण्याचा मान मिळाला आहे. शतकानूशतके विचारवंत,लेखक संशोधक व अभ्यासकांनी ज्याच्या पायऱ्यांवर आपली पाऊले ठेवली त्या पवित्रस्थळी एखाद्या पुस्तकाची नोंद होणे ही बाब त्या पुस्तकाच्या नि लेखकाच्या सन्मानाची तद्वताच त्याच्या जागतिक स्वीकारार्ह्यतेची निदर्शक अशी मानल्या जाते.

    अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण आश्रम शाळेतील इतिहास संशोधक विकास पवार यांच्या ' Century of the Lake Arthur Hill ' या ग्रंथास ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात सूचीबद्ध होण्याचा बहुमान नुकताच प्राप्त झाला. त्यांच्या या पुस्तकात भंडारदरा धरणाच्या निर्मितीपासून आजच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामापर्यंतचा विस्तृत आलेख मांडलेला आहे. दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील शेंडी परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळात स्थानिकांच्या कष्ट सहाय्यातून ब्रिटिशांनी निर्मिलेल्या लोककल्याणकारी धरणाची गाथा यानिमित्ताने सातासमुद्रापार वाचली जाणार आहे.

  ज्यांची जीवनवेल मूलभूत चरितार्थ वा राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक वगैरे विविधांगांनी बहरून आली; अगदी आजतागायत सह्याद्रीच्या भौगोलिक वरदानप्राप्त कुशीतील प्रवरा नदी व तिच्या अस्सल प्रवरापरिसरातील जीवनदायी भंडारदरा धरणाचा जीवनरस प्राशन करून प्रतिप्रवरा परिसरांची प्रतिष्ठापना ज्यांनी केली. त्या दूरदूरच्या सपाट मैदानी प्रदेशातील धरणलाभार्थींना कृतज्ञतेचा बोधपाठ यानिमित्ताने मिळावा ही अपेक्षा.

रविवार, २० एप्रिल, २०२५

शैक्षणिक कर्तव्यातील सफल सेवापूर्ती

           कुठे कामाला होता?........ आता रिटायर्ड असाल ; हो ना?... रिटायर्डमेंटला अजून किती वर्षे बाकी आहेत? असा दर्प असलेला प्रश्नांचा भडीमार कुठल्या ना कुठल्या अस्थापनेतील, सेवाक्षेत्रातील पुष्कळ अभाग्यांना येत असतो. आपण स्वतः देखील तशा मावळतीच्या रंगांनी भरलेले प्रश्न ; चिरतरुणतेचा आजन्म वर भेटल्याच्या अविर्भावात इतरांना विचारत असतो. तसल्या भारवाही दिसणाऱ्या अतिपोक्त, जख्खड अभाग्यांना तसे दिसण्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा मिळायलाच हवी. असो.

          हे सर्व वयाधारित तर्क आडाखे काहींबाबत व्यक्त करणे कठीण असते. अथवा  कुणाला रिटायर्ड घोषित करणे अथवा मानने जिकिरीचे ठरते. अशा काही व्यक्तीरेखा उत्फुल्लपणे आपल्या कर्तृत्व कर्तबगारीच्या शील्पांनी  दिलेला प्रांत अभेद्य बनवतात. जिथे जिथे त्या व्यक्ती कार्यरत राहतात त्या प्रत्येक प्रांत, कार्यक्षेत्राला देदिप्यमान करण्याची कष्टप्रद कलाकुसर आणि कुशलता  समर्पित होऊन सत्कारणी लावतात.

                  ‌ज्या धुरिणांना असे कार्यसंचित लाभले ते धन्य. अशा कार्यधुरिणांच्या मांदियाळीत पी.जे.एस.एस शाळेचे मुख्याध्यापक सन्मा. भाऊसाहेब साळवे सर यांचे नाव त्यांच्या कार्यमुद्रेने अढळांच्या अक्षरसूचीत आपणांस पाहावयास मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील तत्कालीन अहमदनगर  व सांप्रत अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीत पुणे डायसेस च्या प्रजाजागृती संस्थेने जे विधायक व राष्ट्रनिर्माणक  कार्य केले आहे त्याचा भव्य ऊहापोह व जमाखर्च मांडताना अथवा अभ्यासताना तेअनुभवांस येते.फक्त राहाता येथीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील पी.जे.एस.एस संस्थेच्या आजीमाजी मुख्याध्यापकांच्या नामसूचीचे अवलोकन करताना त्या सर्व मुख्याध्यापकांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील या ऐतिहासिक पण वर्तमानात  कार्यरत असलेल्या संस्थेचा हा भव्यदिव्य प्रगतालेख उंचावलेला आहे. तो पाहून ही प्रचिती येते. यात अतिशयोक्त असे काहीही नसल्याच्या वस्तुस्थितीची शाश्वती मिळते. मन कृतज्ञतेच्या भावनांनी विनम्र होते.

           मिळालेला समृद्ध वारसा, हीतकारक तत्वे, परंपरा, मूल्ये संवर्धित करण्यासाठी संस्थेतील प्रशासक, व्यवस्थापक, मुख्याध्यापक ,शिक्षक संपूर्ण कार्यक्षमतेने पीजेएसएस संस्थेत आपला कार्यभार सांभाळत आहेत. मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब साळवे यांचा अडतीस वर्षांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होतो आहे. त्यांचा मूळ पिंड हा शिक्षकाचा आहे. शिक्षक म्हणून त्यांनी राहाता, केंदळ , सोनगाव,कोळपेवाडी आदि ठिकाणी सेवा दिलेली आहे. अडतीस वर्षे इतका मोठा परिप्रेक्ष्य  सेवाकाळात मिळणे ही बाब सद्यस्थितीत तशी दुर्लभ ठरू शकते. सरांना ही सुसंधी मिळाली. त्यांच्यावर विश्वास दर्शवून 'मुख्याध्यापक' पदाचे कार्यअलंकारी आभूषण संस्थेने त्यांना बहाल केले. ते त्यांनी विश्वास पूर्वक जपले. त्या पदाच्या जबाबदाऱ्या सक्षमतेने पार पाडून त्या पदाला त्यांनी उचित न्याय दिला. या पदाचा शिरपेच बहुतांना मुकूट वाटतो. हे खरे देखील आहे पण हा मुकूट मुलतः रत्नजडीत नसून कंटकांकीत असतो. त्या पदाला सांभाळणाऱ्याची कार्यकुशलता, सक्षमता पाहून फलस्वरूप रत्नसन्मानांचा सांभार मुख्याध्यापक पदाला तदनंतर बहुमान म्हणून मिळत जातो.साळवे सरांना तो मिळाला.राहाता येथील  शाळेचा कार्यभार सांभाळल्या पासून त्यांनी अनेक चांगल्या सुधारणा येथील शाळेत व शाळेच्या प्रांगणात घडवून आणल्या. वृक्षारोपण केलेल्या झाडांना जबाबदारीने पाणी देण्याची त्यांची संवेदनशीलता आम्ही पाहिली आहे. विद्यार्थीकेंद्री, विद्यार्थीस्नेही, संस्थाभिमुख, शिक्षकऐक्यानुकूल कार्यशैलीने या शाळेचा अंतर्बाह्य  कायापालट त्यांनी घडवून आणला. प्रशासन, शिक्षक आणि समाज यांच्यातील सामर्थ्यशाली दुवा म्हणून मुख्याध्यापकाचे स्थान महत्वपूर्ण मानल्या जाते. तसा समन्वय आणि दुवा राखण्याची नेतृत्वशीलता साळवे सरांना पूर्णांशाने इथे राखता आली. त्यासाठी त्यांना अधिकचा वेळ देण्याची, अधिकची कष्टप्रदता सोसण्याची सोशिकता बाळगावी लागली. या बाबीची जाणीव या संस्थेच्या प्रशासक, व्यवस्थापक, शिक्षक, पालकांना निश्चितपणे आहे.

         शिक्षक होणे म्हणजे विद्यार्थ्यांतील ज्ञानसंक्रमणाचा, त्यांना शिकवून, साक्षर-संस्कारित करण्याचा व्यवसाय  स्वीकारणे एवढेच अभिप्रेत नाही. तर विद्यार्थी विकासासाठी देवाचे शिक्षणक्षेत्रातील आमंत्रण स्वीकारणे होय. त्याअर्थाने शिक्षक होणे खूप महत्वाचे आहे. "तुम्हीं या सर्व गोष्टी करू शकत नसाल तर शिक्षक होऊ नका". असा कटू पण सत्याधिष्ठीत आदेश 'बायबल' या पवित्र ग्रंथातूनही दिलेला आहे. अधिकारी हे देवाने नेमलेले आहेत. असा उल्लेखही बायबल ग्रंथातून आल्याचे आपणांस माहीत आहे. त्यामुळे त्या-त्या क्षेत्रातील प्रगती अथवा अधोगतीस अधिकारी जबाबदार असल्याचे मानल्या जाते.

         खऱ्या अर्थाने राबणारा, कर्तुत्व करणारा कामगार असतो. पण या कामगारांना प्रेरित आणि कार्यप्रवण करणारा अधिकारी कोणत्याही व्यवस्थेत महत्वाचा मानल्या जातो. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र निर्जीव उत्पादनक्षमतेशी निगडीत नसून जिवंत मन असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. नागरिक घडवण्याचे, विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, जगात सुखस्थैर्य मिळवून देण्याचे कार्य शिक्षकांस करावे लागते. त्यादृष्टीने संस्था,शाळा, पालक, परिसर यानुषंगाने अनुकूलता निर्माण करण्याचे, शिक्षकांना कार्यप्रेरित करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांस पारपाडावी लागते. राहाता येथील पी.जे.एस.एस शाळेचा, येथील शिक्षक विद्यार्थ्यांचा नावलौकिक सर्वश्रूत आणि निर्विवाद आहे. आजतागायत तो टिकून आहे. यामागे संस्थेच्या शिक्षकांचे योगदान नक्कीच आहे. पण या सर्व यशस्वी वाटचालीच्या घोडदौडीसाठी अनुकूत रस्ता, संसाधने, निर्माण करण्याची,समस्या निराकरणाची दूरदर्शी नियोजनशीलता मुख्याध्यापकाठायी असली तरच शाळेतील शिक्षक चांगले कार्य करू शकतो. या शाळेतील उत्साही, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थीस्नेही, तत्वदर्शी, विद्यार्थीहितैषी शिक्षकवृंदांमागे आजपर्यंत आपले साळवेसर भक्कम बुरुजासारखे पाठीराखे झाले. समोर आलेल्या संकटात ढाल झाले. शेवटी शिक्षक हा देखील माणूसच आहे. संकटे, दुःखे, व्याधी यांचे चढउतार त्यांच्याही आयुष्यात येणारच. येथील शिक्षक बांधवांच्या अडीअडचणी, आजारपण, वगैरे तत्सम समस्यात त्यांच्यासाठी ते कृतीशील समुपदेशक बनले. शिक्षणशास्त्र, बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ यांनी आदर्श मुख्याध्यापकांमध्ये जी मार्गदर्शक तत्वे, गुणवैशिष्ट्ये अपेक्षिलेली आहे त्या सर्वांचे संगठण सन्मा. भाऊसाहेब साळवे यांच्यात असल्याचे आपण पाहत आलेलो आहे.

परदेशातून भारतात आलेल्या परदेशीय मिशनरींनी येथील नागरिकात सर्वप्रथम शिक्षणाचा प्रसार केला.  शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.बऱ्या वाईटांची योग्य निवड करण्याची दृष्टी शिक्षण देते. परदेशीय नागरिकांचा सेवाभाव एतद्देशीय मिशनरींनी आदर्श मानून स्थापन केलेल्या शाळेतून तो अवलंबला. पी.जे.एस.एस शाळा ज्या संस्थेअंतर्गत स्थापन झाली त्या संस्थेच्या आदर्शांशी, तत्वांशी सुसंगत अशी मूल्याधारित कार्यप्रणाली शालेय कामकाजात प्रतिबिंबित व्हावी, संस्थेचा नावलौकिक वाढावा म्हणून मुख्याध्यापक या नात्याने श्री भाऊसाहेब साळवे सदैव प्रयत्नशील राहिले आहेत.

               मी सोनगाव येथे राहत असताना साळवेसर लोणी येथून सोनगावला शाळेत येत. तिथे ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. मी वाकडी येथे त्यावेळी शाळेत कार्यरत होतो. रस्त्याने येता जाता दररोज आमची भेट होई. शालेय कामकाजाच्या खूप अगोदर ते शाळेत जात. पुढे मुख्याध्यापक म्हणून राहाता येथे रुजू झाल्यानंतर शालेयकामी ते तितक्याच लवकर शाळेत येत असल्याचे मी पाहिले आहे. लोणी-प्रवरानगर येथील चर्च परिवारात ते नेहमीच कार्यरत असतात. सभा कार्यक्रमातून त्यांचे बोलणे ऐकताना त्यांच्या वाचनाधिष्ठीत विचारीपणाचा प्रत्यय येतो. शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या  लेखनातील शुद्धतेचा ते आग्रह धरतात.व्यक्तीच्या दर्शनीय व्यक्तीमत्वात देखील त्या व्यक्तीचे कर्तृत्व प्रतिबिंबित झाल्याचा प्रत्यय येत असतो. आपण आपले बाह्य व्यक्तिमत्वही जपायलाच हवे. आपला नीटनेटकेपणा आपण जिथे जाऊ तिथे प्रभाव टाकत असतो. ती व्यक्तिमत्वाची देण साळवे सरांना लाभलेली तर आहेच पण ती व्यक्तिमत्वाची देण नीटनेटकेपणाने जपून ठेवण्याची योजकताही त्यांच्यात आहे. कार्यकुशल प्रशासनाच्या संचलनाचे कसब  त्यांच्यात आहे.याच बळ सामर्थ्यांच्या संचित शिदोरी ने संस्थेच्या प्रमुख-मुख्याध्यापक पदाला  त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.

       असे असले तरी  कर्तव्य कठोर असते. कर्तव्यातील अशा एखादया कालखंडात प्रस्थापित  व्यवस्था सेवकाला मग तो कर्मचारी असो वा अधिकारी त्याला व्यवहारी बनवते. रोजगाराच्या ठिकाणी  सर्वस्व पणाला लावण्याचा कटू काळ  अंतर्यामीच्या भावनांना  गोठवून टाकतो. कुटुंबियांकडे दुर्लक्ष होण्याला, दुर्लक्ष करण्याला भाग पाडतो.

         मे महिन्याच्या एकतीस तारखेला सर निवृत्त होत आहेत. याप्रसंगी त्यांच्या मातोश्री उपस्थित राहतील. आपल्या सुपुत्राची सेवाकाल तपपूर्ती कृतार्थ मनाने, त्रिकालातीत मातृदृष्टीने  पाहतील. संतृप्त होतील. अशी मनोकामना साळवे सरांना नक्कीच वाटत असणार ! मुलाच्या निवृत्तीनंतर त्याच्या अधिकाधिक सहवासात आपण राहू शकू अशी भविष्यवेधी मनिषा त्या आईनेही मनात बाळगलेलीच असणार!

 पण त्यापूर्वीच अवघ्या काही दिवसांपूर्वी त्या मातेला हा सोहळा अनुभवण्याविना इहलोक सोडून जावे लागले. सरांच्या या शल्याची टोचणी आपण समजू शकतो.

             सरांच्या सहचारिणी आदरणीय मंगलमॅडम यांचा मी विद्यार्थी आहे. माझ्या बाल्यावस्थेत  एकोणचाळीस वर्षांपूर्वी सहाव्या इयत्तेत इंग्रजी विषयाचे अध्यापन त्यांनी आम्हांल केले आहे. त्यांनी आम्हांला जसे शिकवले तशी अध्यापनशैली, शिक्षणविषयकसमर्पनशीलता, आम्हा शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांत पूर्णांशाने येण्यायोग्य पात्रता निदान माझ्यात तरी नाही. हे मी सविनय कबूल करतो. म्हणून माझ्या आदरस्थानी असलेल्या , ज्यांना मी मनोमन वंदन करतो अशा आदर्श शिक्षकांपैकी आदरणीय मंगल मॅडम या माझ्या आदर्श आहेत. गुरुमाता आहेत. त्यांनी दिलेल्या विद्येच्या कल्याणकारी पाठांना प्रेरणा, प्रमाण, पूज्य मानून माझी वाटचाल चालू आहे. गुरुऋण हे न फिटणारे असते. पण साळवेसर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या गुरुमातेविषयक व्यक्त केलेली कृतज्ञता ओघानेच साळवे सर यांच्यासाठीही आहे. म्हणूनच साळवेसर यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या नवीन पर्वासाठीच्या शुभेच्छा माझ्या बाल्यावस्थेतील शिक्षिका आदरणीय मंगल मॅडम यांनाही देतो.

          आयुष्यात उभे राहण्यासाठी ज्यांच्या आशीर्वादांची पाखर मला लाभली त्यापैकी एक असणाऱ्या साळवे कुटुंबियांचे ऋण मानण्यात मला धन्यता वाटते. 

निवृत्तीनंतरच्या सुखपूर्ण,आरोग्यदायी, श्रांत-कृतार्थ, निश्चिंत दिनक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छां त्यांच्या सोबतीला असो.

                               सुरेश दगडू भिंगारदिवे,                                                                                                                     राहाता.

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

भाऊ

 शाळेच्या ऑफिसात भाऊने आणलेली चप्पल आता तुटली आहे .भाऊ चप्पल कारागीर आहे का? असा प्रश्न एकाने विचारला त्याला दिलेल्या उत्तरादाखल पुढील भाष्य करावे लागले. भाऊ खरेच कोण होता?.....रांजणखोलचा कुंभार...श्रीगोंद्याचा अना-गोंदया...वस्तू व सेवाकर कार्यालयाचा कमिशनर! एवढ्या मोठ्या महामहीम महोदयास फक्त आपणच भाऊ म्हणून संबोधू शकतो.'सत्ते पे सत्ता ' चित्रपटातील सर्वांना सांभाळणारा भाऊ म्हणून सर्वजण त्याच्यापुढे एकेकाळी झुकायचे.बिचारा कुटुंबीयांसाठी 'वाल्ल्या' झाला.एखादा देवमाणुस भाऊला भेटावा. त्याच्या कृपाशिर्वादाने उर्वरित राहिलेल. ' कर काण्ड 'प्रकरण पूर्ण व्हावे.या सदिच्छे सह कार्यालयाच्या स्वच्छतागृहाबाहेर आपण नवीन खडावांची प्रतिष्ठापना करूयात.एवढेच आपल्या हाती. भाऊच्या हौदात पाण्याची वाणवा,कमतरता न पडो.या सदिच्छे सह.

भाऊला आता साहेबांनीच घरी बसवलय. तोंडात भरमसाठ मूग कोंबून. लगेचच संस्थानच्या तिजोरीवर फणा उभारलेला दुसरा नागोबा त्यांना नेमावा लागला. त्यांना तसे करणे भागच होते.राज्याचे सर्व कारभारी मुंबईलाच अधिकाधिक वेळ असतात. शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील ठराविक दोन दिवस संपर्क कार्यालयात ते हजेरी लावतात. उर्वरित काळात एखाद्या धुरंधर चाणक्याला बसवून त्याच्या मार्फत कार्यालय चालवतात. साहेबांचे याप्रमाणेच सारे चालले होते. एज्युकेशन सोसायटीच्या बहुतांश शाळा,तेथील शिक्षक यांच्यावर भाऊचा वचक चांगलाच बसला होता. शासकीय अनुदानावर संस्थेची जहागिर सांभाळणा-या मूळ मालकाला अर्थात नामदार साहेबांना घाबरणे दूरच; ऑफिसातली सारी मंडळी भाऊलाच भीत.  

कर्मचा-यांच्या अगोदर अर्ध्या-पाऊण तासाच्या फरकाने हजर राहून भाऊ त्यांना दहशतीत ठेवायचा.सर्वांना कामाला लावून चोर पावलांनी घरी जाऊन दुपारची मस्त झोप घ्यायचा;आणि पाच वाजण्याच्या अर्धा तास पूर्वी , ऑफिसातल्या खुर्चीवर तो येऊनही बसायचा.भाऊच्या आवाजात एक जीवघेणी जरब होती.चाबकाच्या आवाजाने गाया-घोडे,बैल आदि मुकाट्याने पळावीत तशी शाळेतली मुलं वर्गाच्या दिशेने शिस्तीत जायची.तर शिक्षक मंडळी आपण किती प्रामाणिकपणे शाळेसाठी झटत आहोत;पोटतिडकीने शिकवत आहोत असे खरे खरे दाखवण्यासाठी धडपडत होती.तसे हे खरे ही होते.तितकेसे अनुकूल मत नसलेल्या तालुक्यातील या मोठ्या शाळेत शहाणी माणसं यायला उत्सुक नसत.

या पार्श्वभूमीवर गोरगरीबांच्या वंचित लेकरांच शिक्षण व्हावं अशा उदात्त भावनेने भाऊ या शाळेत आला होता.खास तीन ते चार लाख रुपये एवढ्याच साठी त्याने मोजलेत हे देखील आम्हाला बाहेरुन समजायचे.एक मात्र कबूल करावे लागेल की भाऊने सर्व स्टाफची नाडी ओळखली होती. एकेकाच्या शक्तीस्थळाची किंवा उणेपणाची अचूक-अदृश्य परीक्षा घेऊन त्या-त्या व्यक्तीला तो चांगलाच पळवायचा.त्याओघात शाळेचे नि विद्यार्थ्यांचे आणि योग्य वेळ साधून स्वतःचेही विकासकाम साधून घ्यायचा.बांधकामाची व्यवसायबुद्धी असणा-या दीपराज सरांना घरच्या बांधकामाचे तोंडी कंत्राट देऊन त्यांच्याकडून तळमजला बांधून घेतला. मजुरांच्या कार्यक्षम टोळ्या आणून भाऊच्या घराला हाथ लावणारा हा टोळीप्रमुख आम्ही पुढे हतबल होताना पाहिला.दीड-पावणेदोन लाखांची तळमजल्याच्या बांधकामापोटी झालेली मजुरांची मजुरी दीपराजनेच कर्ज काढून चुकती केली.

            भेटलेले नैसर्गिक अक्राळ-विक्राळ रुप व धूर्त त्रुटीशोधक बुद्धीची देणगी या बाबी भाऊला हिटलर बनवण्यास कारणीभूत झाल्या. 'आठशे खिडक्या; नऊशे दारं 'असलेल्या इमारतीतून खाजगी कामाच्या निमित्ताने वारंवार शाळेेच्या बाहेर पडणारा सर्जेराव वाघ एकदा भाऊने पकडला.भाऊला पाहताच तो आवारातच चक्कर येऊन पडला. फिट्सचे बरे झालेले दुखणे त्या दिवसापासून त्याच्या मागे लागले.सगळा स्टाफ त्या दिवसापासून त्याला 'चक्रवर्ती' असे संबोधू लागला.

   साहेबांच्या निधीतून आलेल्या एकूण संगणकांपैकी कांही संगणक भाऊने गुपचूप घरी नेले. इलेक्ट्रॉनिक फंडाची कास नव्या अर्थाने भाऊने धरली.मात्र वयोमानपरत्वे म्हणा किंवा अति मोह आवरता न आल्याने भाऊचे 'माठेपण' त्याचे त्यालाच संपवता आले नाही. म्हणून तर ऑफिस स्टाफच्या वार्षिक उत्पन्नावरील अडीच-तीन लाखांचा कर सरकारी तिजोरीत जमा न करता स्वतःच्या खाजगी बांधकामावर त्याने तो उडवून टाकला.दहा वर्षांपासून चालू असलेले आणि प्लिंथलेव्हल पर्यंत येऊन थांबलेले 'कल्पतरु' लाॅजचे बांधकाम मार्च एन्डला शाळेेेच्या खात्यात शिल्लक असलेले सेस 

अनुदान काढून सुरु केले. वस्तू व सेवा कर कार्यालयात वर्षाला भरावयाचा अडीच तीन लाखांचा टॅक्सही त्याने लुटमारीचा फंड म्हणून वापरुन टाकला.नेमका भाऊ येथेच अडकला.आर्थिक वर्षातील संपूर्ण स्टाफचा कर भरला न गेल्याने आम्हाला आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या. अपहार उघड झाला.


  आमचा टॅक्स आयकर विभागापर्यंत पोहोचला नसल्याने आम्हीही चोरच झालो. करबुडवे ठरलो.भाऊने आमचा खिसा कापला. भाऊचे प्रमोशन तर जवळ आलेले. बोभाटा होऊन प्रमोशनवर गडांतर यायला नको म्हणून तो कामाला लागला. सगळ्या गुणदोषांसह भाऊला मित्र म्हणून स्वीकारणारे 'लोखंडे 'पुन्हा भाऊच्या कामी आले.स्वतःच्या नावाने कर्जरोखा करुन भाऊला 

त्यांनी चार लाख रुपये दिले.पण ते चार लाख भाऊचे आठ घोटाळे मिटविण्यासाठी पुरेसे नव्हते.सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या शहरात गर्दी वाढेल. संस्थानी आश्रमात ती पुरणार नाही. म्हणून आजपर्यंत अपूर्ण राहिलेले वीस-पंचवीस खोल्यांचे बांधकाम आपण पूर्ण करु.गर्दीच्या पुराचे काही लोंढे लाॅजच्या दारातून आत घेऊ.अगस्ती तृष्णेने त्यांना पिऊन टाकू.अशा अवास्तव महत्वाकांक्षेने शाळेच्या विविध योजनांच्या रकमा भाऊने जुगारावर लावल्यागत पटापट संपवून टाकल्या. शतकमहोत्सवी समाधी संवत्सर आणि सिंहस्थ कुंभमेळा अशा दोन्ही पर्वण्यात वाढलेली गर्दी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या मुक्कामी थांबेल. नोटांची रास देऊन,आपल्या गल्ल्याची कणगी भरुन सारे सिंहस्थ मार्गस्थ होतील. त्यांच्या आशीर्वादाने मग सा-या हायजॅक केलेल्या सरकारी रकमा शाळेच्या खात्यात पुनर्जिवित करु.मग सारे ठीक होईल. आलबेल जैसे थे चालू राहील. असे काही भविष्यात्मक तर्क करुन काही हजारो किंवा लक्ष दक्षलक्षांचे आवकी गणित मांडून भाऊने शाळा खाते स्वतःच्या क्रेडिट साठी भांडवल म्हणून डावावर लावले.भविष्यातील नफेखोरीचा तार्किक ताळेबंद डोक्यात मांडून कामाच्या ठिकाणीच आर्थिक भूयार करून खड्डा पाडला.

           त्याच कालावधीत शाळेतल्या वायळ बाईंनी फ्लॅट घ्यायला कर्जाचा प्रस्ताव बॅन्केकडे सादर केला.वार्षिक करभरणा केल्याची पावती त्यांना मिळाली नाही. उलट तुम्ही सरकारचा कर बुडवला. 'तुमच्यावर कारवाई का करु नये ?' याबाबतचा खुलासा मागणारी नोटीस पॅन खात्याच्या स्क्रीनवर हायलाईट झाली. सी.ए.ने तिची प्रिंट बाईंना दिली.बाईंनी ती शाळेत सा-यांना दाखवली.शाळेतली सारीच मंडळी आपापली नोटीस घेऊन सरळ हेडऑफिसला धडकली.चौकशी समिती दुस-या दिवशी शाळेत आली.रकमा हडप झालेल्या होत्याच. त्या सगळ्या आठ दिवसात खात्यावर भरा.त्यासाठीच्या तयारीला लागा.असा दम भरुन आणि टी.ए.डी.ए.चा बंद लिफाफा घेऊन समिती निघून गेली.

     उघड झालेला घोटाळा मिटवायला तो तसा बिलंदर होता.उर्वरित आर्थिक योजना राबवताना फुगवटा-तुटीचे एकतर्फी गणित मांडून त्याने 'करप्रश्न' सोडवलाही असता.पण नेमकी तेव्हाच बदलीची ऑर्डर येऊन धडकली.हेडऑफिसला भाऊचे हेलपाटे वाढले.बदलीच्या समान पिडेने त्रासलेल्या समुहात तोदेखील मिसळला.त्यांच्यासोबत कोर्टाची पायरी चढला. भाऊचा पिंडच मुळी आक्रमक आणि वृत्ती बंडखोर.पण हातून घडलेले प्रताप अटकेपार फडकलेले. यामुळे भाऊ गप्पच राहिला. 'कल्पतरु'चे बांधकाम बंद पडले.मनःस्थिती ढासळली. शरीराचा तोल बिघडला.एके दिवशी ग्राउंड फ्लोअरच्या हौदात भाऊ नळीने पाणी भरत होता. तोल जाऊन त्या दिवशी तो हौदात पडला. बाहेर काढायला तीन चार माणसे धावून आली.त्यांच्या आधाराने त्याला कसेबसे बाहेर येता आले. पण सा-या देहाचा रोबो झाला .पायांची चाल बदलली .छातीच्या हाडाचा अस्थिभंग झाला.कटिबंध आणि पाठ-पोट छाती यांना इलॅस्टीक पॅडींग लागले.खांदे झुकले.'कल्पतरु' लाॅजचे बांधकाम बंद पडले.सिंहस्थ पर्व जवळ आले.शाही स्नाना साठी जाणा-यांची, किंवा ते करुण आलेल्यांची सशुल्क सेवा भाऊच्या नशिबी नव्हती. कोणीतरी मजेने त्यालाच स्नानासाठी जायची आवश्यकता पटविली. त्याला अनुकूल असणा-यांची एक स्वतंत्र फळी संस्थेत आणि शाळेत होतीच. त्या 'डी' कंपूसह नदीच्या काठी उथळ कुंडात भाऊ अभिषिक्त झाला. कमरे इतक्या पाण्यात पोटाने वर्तुळे काढत भाऊ नदीत गरगर फिरला.पाण्यात देहाचा भार हलका होतो.बेभान होऊन कुंडात रिंगण धरले.गिरक्या घेतल्या. अदृश्य दंडुकेधारी बाबा समोर डोळे झाकून कान पकडले. दोन्ही हातांची कैची बनवत स्वतःच्या श्रीमुखात हाणून घेतले.बोंबा ठोकत डुबक्या मारल्या.त्याचा जिवलग जिवाचा सखा रेवजी पुन्हा कुंडात उतरला.स्वतः ओला झाला.भाऊच्या जवळ गेला.रेवजीला भाऊने मिठी मारली. "आता बास कर.सगळं काही नीट होईल." असे म्हणत रेवजीने त्याला काठावर आणले.

परवा सहज पेपर चाळताना एक पॅम्प्लेट खाली पडले.पेपरातील असे कोणतेही पॅम्प्लेट मी वाचल्याशिवाय रद्दीत टाकत नाही. या सवयीप्रमाणे ते वाचून काढले. 'कल्पतरु' जलसेवा

ही हेडींगची अक्षरे मला परिचयाची वाटली.त्यातल्या 'जलसेवा' शब्दाच्या ठिकाणी 'लाॅज' हा शब्द असावा असे मला वाटले.मी लगेच दीपराज सरांना फोन करुन

 ' कल्पतरु जलसेवा ' या फर्मबद्दल विचारले.तेव्हा त्यांंच्याकडून कळले की भाऊने लाॅज बांधण्यासाठी स्लॅपचे जे स्ट्रक्चर उभे केले होते त्यात भिंती न घालता आरोप्लांट टाकला आहे.त्या व्यवसायात त्याला चांगला सूर ही सापडला आहे.त्याचे आता चांगले चालू आहे.  

     यावर मी त्याला म्हटले की,सर्वस्व गमावलेल्या मरणासन्न पक्षाची राखेतून उडून भरारी घेण्याची गोष्ट ऐकली होती. पण तसा फिनिक्स पक्षी प्रत्यक्षात आपल्या अवतीभवती देखील विहार करतो आहे. हे ऐकून किंवा उद्या त्याला प्रत्यक्ष पाहून आश्चर्य वाटू नये. त्यावर तो जे म्हटला ते ऐकून मी जास्त विचारात पडलो.तो म्हणाला, "पण हा दुस-यांंना जाळून,त्यांची राख करुन त्या राखेतून मुसंडी मारतो."

        मी त्याला विचारले, " असे का म्हणतो आहेस ?" त्यावर त्याने सांगितले की,पदर खर्चाने कामगार आणून मी भाऊच्या लॉजचे स्ट्रक्चर उभे केले. त्या मोबदल्यात कामगारांना द्यावयाचा पगार त्याने नाकबूल केला.कामगार माझे असल्याने मीच तो देऊन टाकला. बायकोचे मंगळसूत्र मोडून.

      माझी आता खात्री झाली:भाऊ खरोखरच फिनिक्स आहे;पण मी म्हणतो तसा नाही.दीपराज म्हणतो तसा !

 ' दुस-याची राख करून त्या राखेतून मुसंडी मारणारा ! '

देशी फिनिक्स

                                            सुरेश भिंगारदिवे,राहाता





रविवार, १ सप्टेंबर, २०२४

बाजार

                            

बाजार भरलेला असूनही

काही घ्यायला

मन होत नाही.


आता गरम खिसाही

आतल्या आत

पोळवू लागला आहे हात.


घरट्याच्या कवचाचे 

काठिण्य दुभंगवायला,

एकेक मजबूत मेढ

जमीनदोस्त करून

करपवून टाकायला ;

कधीची वाट शोधतोय

तप्त लाव्हा बाहेर यायला.

          दगडपुत्र भिंगारदिवे

रविवार, ३१ मार्च, २०२४

मिलिंद'ने दिलं सुज्ञपणाचं देणं.... सार्थकी जगणं !

 

आजपासून मागील बत्तीस तेहतीस वर्षांपूर्वीच्या ; मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत मी माझं अननुभवी नि संकुचित अस्तित्वाचं हरवलेपण घेऊन आलो होतो. शासकीय वसतीगृहातील प्रारंभिक प्रवेशार्थी यादीत मी नसल्याने सुरवातीचा माझा मुक्काम कॉलेजच्या वसतीगृहात होता. तिथेही खोली न मिळाल्याने परिस्थितीचे भांडवल करत  कॉमनहॉल मध्ये राहण्याची सवलत मिळवली.  पहिल्याच दिवशी तिथे माझा अंगावरचा बिछाना चोरी गेला. तेवढे निमित्त मिळाल्याने मी घरी निघून आलो. हायस्कूलच्या बोर्डींगमधून असा न विचारता घरी गेलला विद्यार्थी पळकुटा ठरतो. पण दहावीनंतर कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रौढपण त्या-त्या स्थानिक संस्थेने गृहीत धरलेले असल्याने माझ्या पाठलागाचा प्रयत्न वा सुरक्षित असल्याबाबतची खात्री ट्रेनिंग कॉलेज वा त्याच्याशी निगडीत असलेल्या वसतीगृहाने करण्याचे काही कारण नव्हते.

         घरी चार दोन दिवस राहिल्यानंतर लोकनिंदा अथवा पुढील भविष्याच्या काळजीने कुटुंबियांनी पुन्हा मला औरंगाबादला जाण्यास भाग पाडले. ते साहजिकच होते.

         कॉमन हॉलमध्ये राहून कॉलेजमध्ये जाणे, वर्गात बसणे माझ्यादृष्टीने कठीण होते. ती माझीच नकारात्मकता होती. माझ्या सारखीच परिस्थिती असलेल्या पुष्कळ विद्यार्थ्यांनी खंबीरपणाने स्वतःला सावरून घेत शिक्षणाचा यज्ञ चालू ठेवला होता. मला मात्र ते जमत नव्हते. तशी आणि तेवढी क्षमता माझ्यात नव्हती. रडून रडून हवी असलेली गोष्ट मिळवण्याचा पोरकट बाल अट्टाहास इथंही मी प्रभाकर साळवी भाऊसाहेबांकडे केला. पूर्वीचा कोणताही संबंध नसताना या दयाळू माणसानं मला धीर दिला. जयसिंगपुरा येथील शासकीय वसतीगृहात नियमाच्या बाहेर जाऊन माझं तात्पुरतं पुनर्वसन त्यांनी केलं. कार्यालयातून त्यांची सुट्टी झाल्यानंतर सिडको वसाहतीपासून इथपर्यंत ; खूप लांबच्या अंतरावर स्वतःच्या मोटारसायकलवर त्यांनी मला आणून सोडले.  आदरणीय खिल्लारे सर  अधिक्षक असलेल्या वसतीगृहात माझ्या आश्रयाची तात्पुरती व्यवस्था त्यांनी केली.माझ्यासाठी त्यांना तिथे खिल्लारे सरांकडे विनंती करावी लागली.

पुढील यादीत नाव येईल असा आशावाद देत कॉलेजला मी नियमित जात जावं असा काळजीयुक्त आग्रह मला ते प्रत्येक वेळी करत. त्यांचा खूप मोठा आधार माझ्या मनाला मिळाला. नवीन यादी जाहीर होऊ पर्यंत मी अधिकच उत्सुक होतो. त्यांच्या कार्यालयापर्यंत माझे सारखे जाणे, त्यांना भेटणे, वसतीगृह प्रवेशाच्या निवडयादीविषयी विचारणा करणे शिष्टसंमत नव्हते. पण माझ्याकडून ती चूक घडत होती. विचारांच्या संकुचितपणामुळे अथवा मोफतचे अधिक मिळवण्याच्या हव्यासातून मी अधिकच उत्सुक झालो होतो. त्या चुकांची जाणीव नंतर प्रकर्षाने होत गेली. मात्र त्यावेळी साळवी साहेबांनी तशी नाराजी कधी व्यक्त केली नाही.

        प्रत्येक वेळी इतका आश्वासक आधार देऊन ते मला निरोप देत ; की पुढील भेटीपर्यंत वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी वाट पाहण्यात अस्वस्थता नाही तर एक विलक्षण ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येई.

        त्यानंतर थोड्याच दिवसांनी वसतीगृहाच्या नोटीस बोर्डावर  प्रवेशार्थींची पुरवणी यादी लागली. त्यात माझे नाव होते. कॉलेजजवळच्याच ‘मिलिंद’ वसतीगृहात प्रवेश मिळाला होता. तिथल्या तिथे प्रवेश घेतला.यादी साळवी साहेबांकडूनच आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे फार तर एक दोनदाच भेटायला गेलो असेल. त्यावेळी वयाच्या मर्यादेमुळे अतःकरणीय भावुकतेने त्यांच्या प्रति कृतज्ञ होणे मला जमले नसेल. पण इतक्या मोठ्या बत्तीस तेहतीस वर्षांच्या कालावधीत  वयाच्या पोक्त अवस्थेत  सुखस्थिरपणाचा लाभ मिळवून देण्यात ज्यांचे योगदान महत्वाचे ठरले त्यांना भेटायला कधी छत्रपती संभाजीनगरला आलो नाही. ही आता झालेली जाणीव अपराधीपणा निर्माण करणारी आहे. मला साळवी सरांना भेटायचे आहे.

   ‘मिलिंद’ ही वसतीगृहाची इमारत खूप प्रशस्त. तळ मजल्यावर आणखी दोन मजले चढवलेले. माझ्या तोकडया अनुभवविश्वानुसार तिला मी तीन ताळाची इमारत म्हणत असे. मधल्या ताळातल्या एका वरिष्ठ विद्यार्थ्याने पठाणसरांच्या सांगण्यानुसार आपुलकीने मला त्याच्या खोलीत नेले. माझी काळजी घेणारी आणि माझ्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी अशी ती वडिलधारी मंडळी होती. चांगली अभ्यासबैठक व्हावी अशी टेबल,खुर्ची आणि पलंगाची मांडणी त्या खोलीत मी केली. भिंतीतल्या कडाप्यांच्या एक-दोन कप्यात पुस्तकं ठेवली.

         संध्याकाळी मेसमध्ये जेवण करताना वरच्या मजल्यावरील एका मोठ्या मुलाने वरच्या मजल्यावर रहायला येतो का ? वरती आमच्या शेजारच्या खोलीत एक जागा आहे. ये तिथं. मधल्या मजल्यावर त्यांच्यात काय राहतो ! वरच्या खोलीत सगळे आपलेच आहेत.” अशी द्वेषपेरणी त्याने माझ्या मनात केली. मला ते समजले नाही. तितकं शहाणपण आणि चांगुलपण माझ्यात नव्हतं. आणखी एका मजल्याने वर असलेल्या तिसऱ्या ताळावरील खोलीत राहून उंचावरच थ्रील अनुभवण्याचा खुजा विचार मनात आला

       मधल्या मजल्यावरून आणखी एका मजल्याने वर असलेल्या तिसऱ्या  ताळातल्या खोलीत शिफ्ट झालो. पण आधीच्या खोलीतील मंडळी नाराज झाली. त्यांना दुखावून बाहेर पडलो होतो. कुणाच्यातरी भेदनीतीला माझं संकुचितपण बळी पडलं होत.

        नवीन खोलीतील मंडळीही चांगलीच होती. पण रात्र होऊनही झोपेच्या अधीन न होणारी ही जागरूक मंडळी मला माझ्या झोपेची शत्रूफळी वाटू लागली. एका टेबलवर तर आकाशवाणी चालू होती. रेडिओ सिलोन, विविधभारती यांसारखी केंद्रे माझ्या झोपचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी शत्रूतळं आहेत असं मला आता वाटू लागलं. मध्यरात्र उलटून गेली तरी रेडिओ बंद होत नव्हता.  बाहेरच्या दाट होणाऱ्या रात्रीच्या वातावरणात रेडिओ कमी आवाजात असूनही एक एक गाणं एकेका पंक्तिसह स्पष्टपणाने ऐकू येत होतं. शाळेतल्या गायक विद्यार्थ्यांच्या पहिल्या समुहात माझा बोलबाला होता. दहावीच्या बोर्डाची परीक्षा चालू असताना, दुसऱ्या दिवशीच्या हिंदी पेपरची काळजी न करता मी तालुक्याला जाऊन ‘मिलन’ हा जुना अभिजात चित्रपट पाहून आलो होतो. तिकडे गावाकडे घरात अजून टीव्ही नाही. इथं होस्टेलला या मजल्यावर टीव्ही हॉल आहे. त्या हॉलनेही मला खुणावले होते. वरच्या मजल्यावर येण्याला ते देखील एक कारण होतं. सध्या टी.व्ही. नादुरुस्त असल्याने आज तो पाहता आला नव्हता. उद्या तो दुरुस्त होऊन आला आणि असे अवेळी त्याला कुणी चालू ठेवले तर आपल्या अभ्यासाचं,झोपेचं काय होणार ? या विचाराने झोप मोडून डोळे पूर्णपणाने उघडले. आता यावेळी लगेच खाली जाऊन त्याच खोलीत आपलं बस्तान बसवावं असं तीव्रतेने वाटलं.

     सकाळ व्हायची वाटच पाहत होतो. साडेपाच सहालाच साहीत्यासह खाली; त्या कालच्याच खोलीत आलो.पण त्या खोलीतल्यांनी लगेच “आमच्या रूममध्ये आता राहता येणार नाही. दुसऱ्या खोलीत तू तुझी व्यवस्था कर.” अशी सज्जड तंबी दिली. माझ्याविषयीचा राग आणि नकार त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होता. तो संपणारा नव्हता. माझी चूक मला कळली होती. त्यांच्याकडे ती कबूलही केली. त्यांनाही माझा पश्चाताप समजत होता. पण वय आणि त्यापरत्वे येणाऱ्या समजूतदारपणापेक्षा सूडाची भावना त्यावेळी त्यांच्यात जास्त होती. मला तरीही त्यांच्यातच राहण्याची  ईच्छा होती. एवढा विश्वास मला त्या स्थितीतही त्यांच्याविषयी वाटत होता. पण त्यांना आता मी नको होतो.

      “ दहा वाजता ऑफीस उघडेल. पठाण सरांकडून दुसऱ्या खोलीत राहण्याची व्यवस्था करून घे. इथं तुझं हे साहीत्य दिसायला नको.” अशी धमकीच त्यांनी मला दिली. त्यांचा तो असहकार मला परवडणारा नव्हता.

      सकाळी ऑफीस उघडल्यानंतर पठाण सरांकडून खोली बदलून घेतली. खालच्या मजल्यातली स्वच्छतागृहाजवळची खोली नव्यानं मिळाली. गावाकडे देखील माझ्या गल्लीतल्या घराजवळ ग्रामपंचायतीने बांधलेली दहा-बारा स्वच्छतागृहे आहेत. अविवेकी प्रलोभनांच्या आहारी जाण्याच्या फलस्वरूप सर्वात वरच्या मजल्यावरून खाली जमिनीवर असा येऊन पडलो ; म्हणून सुधारलो.

       चांदोबा सूर्यवंशी, बिपीन  जैस्वाल आणि विठठ्ल कोलते ही माझ्याच वयाची मुलं नवीन खोलीत होती. बिपीन जैस्वाल हा शरीराने कमालीचा विकल,विपन्न आणि अधू होता. पण मनाने आजच्या भाषेत दिव्यांग होता. बारावी वाणिज्य शाखेत त्याचे शिक्षण चालू होते. जेमतेम चारफुट उंच शरीरयष्टी. ती देखील एका बाजूने पूर्णतः अतिकृष वा शुष्क झाल्यासारखी वाटावी अशी. पाठीमागे एका खांदयाचे भले मोठे कुबड निघालेले. आमचं सूत्र खूप चांगल जुळून आलं. जैस्वालला स्वतःचे कपडे धुणे अशक्य असल्याने लॉन्ड्रीमधून ते त्याला धुवून आणावे लागत. त्याचे ते कपडे मी धुवून देऊ लागलो. पुढे पुढे माझ्या विश्वासावर तो एकटाच बाथरूममध्ये जाऊन कपडेधुलाई पावडरमध्ये कपडयांना भिजवून ठेवी. त्यांना पिळणे,वाळवणे याकामी मग तो मला बोलवायचा. त्याच्या बी.कॉम. पदवीच्या तिनही परीक्षांचा मी लेखनिक राहिलो. तो कधी नापास नाही झाला. त्याचा कधी विषय बाकी नाही राहिला. एम. कॉम. संपल्यानंतर 'अम्बा','अप्सरा' या चित्रपटगृहां समोर हातगाडीवर त्याने धंदा सुरु केला. जिद्द आणि चिकाटी एकवटून ठेवत, त्यांचा योग्य वापर योग्य वेळी करण्याचे कसब त्याला पुरते जमले होते. विवाहानंतर पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह तो आनंदातच होता.कॉमर्सचे शिक्षण प्रत्यक्ष जीवनात वापरून पुढे त्याने भाडेतत्वावर एक गाळा थाटला. आजच्या संभाजीनगरातल्या नारळीबागेत एक फ्लॅटही विकत घेतला. फोनवरून आमचा संवाद खूप चांगला चालायचा. पण आज तो नाही. पाचसहा वर्षांपूर्वीच आजाराचे किरकोळ निमित्त होऊन तो मयत झाला. निसर्गाने त्याला दिलेल्या विकल शरीराची कालमर्यादाच तेवढी असणार !

           खोलीतला दुसरा रूम पार्टनर होता- चांदोबा सूर्यवंशी. सकाळी खूपच लवकर कॉलेजात जाताना आणि तेथून परत आल्यानंतर फक्त अभ्यास करताना, नीब असलेल्या  फाऊटंन पेनने सुंदर - सुवाच्च अक्षरात जरनल लिहिताना वा नोट्स काढतानाच मी त्याला नेहमी पाहत असे. देशांतर्गत वा जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या मॅच मात्र तो पाहिल्याशिवाय राहत नसे. होऊन गेलेल्या जुन्या सामन्यांची क्षणचित्रे अगदी रात्री अपरात्री टिव्ही हॉलमध्ये जाऊन पाहत बसायचा. बारावीला चांगला ग्रुप आणि ॲग्रीकेट मिळवून एम.बी.बी.एस. ला जाण्याच्या ध्येयवादावर मात्र तो अढळ होता. हॉस्टेलमार्फत मिळालेल्या दिडशे रुपयांपैकी शंभरएक रुपये तो घरीही पाठवायचा. खूपचं सामान्य आणि दारिद्रयाने ग्रासलेल्या कुटुंबातला हा चांदोबा अव्वल गुण मिळवून मेडिकलला गेला सुद्धा. मेडीकलचे शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय अधिकारी म्हणून तो कुठेतरी कार्यरतही होता. या अभ्यासशील ध्येयाकांक्षी डॉक्टरला भेटून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे मनात ठरवले होते. पण मध्यंतरी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्वाईन-फ्ल्यूच्या संसर्गानं झालेल्या त्याच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रातून वाचली. उमेदीच्या वयात जग सोडून गेलेल्या चांदोबाची आठवण खूपदा होते. अस्वस्थ करते.

         पदमपुरा येथील मिलिंद व संत तुकाराम ही एकमेकांलगत असलेली वसतीगृहांची जोडी आणि जयसिंगपुरा येथील विद्यापीठ परिसरालगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह यापैकी ज्या कोणत्या वास्तूत आपण राहिलो त्या वास्तूने आपल्याला निवारा दिला. ‘ज्ञान जागेपणी सोबत करते तर रात्री ते आपले रक्षण करते’    या अर्थाचे एक सुवचन बायबल मधील नीतिसूत्रांच्या प्रकरणवजा पुस्तकात दिलेले आहे. या जागेपणा आणि निद्राधीन अवस्थांतील ज्ञान प्रभावित वास्तव्याचा कोवळा काळ   वसतीगृहाच्या रक्षक तटबंदीने सर्व अरिष्टांपासून सुरक्षित ठेवला. त्याला जपले. कल्याणकारक आयुष्यासाठी शिक्षणाचा यज्ञ चालू ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या व्यवहाराची धग लागू दिली नाही. विद्यार्थी अवस्थेत आवश्यक असणाऱ्या आदर्श अशा सर्वच  बाबी वसतीगृहाने पुरवल्या. सांप्रतकाळीही काल्पनिक वाटाव्यात अशा सोयीसुविधा त्या काळात 'मिलिंद', 'संत तुकाराम', 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या व यांसमान शासकीय वसतीगृहातून विद्यार्थ्यांना मिळत होत्या. हितकारक आयुष्यासाठी वसतीगृहाने भौतिक स्थेर्य तर दिलेच पण त्याबरोबरीनेच शाश्वत आत्मोन्नतीसाठीच्या कलासाहित्यादि संस्कारांचे, नीतिमूल्यांचे संस्करण विविध कार्यक्रम, उपक्रम, दिनविशेष वगैरेचे औचित्य साधून आमच्यात संस्कारित केले. घरापासून दूर असताना कुटुंब नामक घरटयाची परिवारात मिळते तशी संजीवक ऊब मिलिंद वसतीगृहात मिळाली. आजच्या सुखस्थिर आयुष्याची मुहूर्तमेढ वसतीगृहाने केलेल्या तत्कालिन संगोपनामुळेच रोवल्या गेली आहे. वसतीगृहाने दिलेल्या या अफेड देयदानाचे स्मरण आजीवन राहील.

                            सुरेश दगडू भिंगारदिवे,

                             राहाता, अहमदनगर 

                             ९८६०२०२३८६    

 

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...